बॉर्डर गार्ड बांगलादेश आणि सीमा सुरक्षा दल यांच्यात होत आहेत चकमकी

भारत-बांगलादेश सीमेवर आसामपासून बंगालपर्यंत तणाव

ढाका (बांगलादेश) – बंगालमधील विधानसभेचे निकाल लागून भाजपचे सरकार आल्यापासून भारत आणि बांगलादेश सीमेवर मोठ्या प्रमाणावर तणाव वाढला आहे. हा तणाव विशेषतः भारत-बांगलादेशाच्या ४ सहस्र ९६ किलोमीटर लांबीच्या सीमेच्या त्या भागांत दिसून येत आहे, जिथे काटेरी तारांचे कुंपण आहे. घुसखोरी रोखण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे बांगलादेशाचा पक्ष संतापलेला दिसत आहे.

९ मेपासून सीमा सुरक्षा दल आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) यांच्यात चकमकीच्या ८ घटना घडल्या आहेत. यामध्ये बांगलादेशी नागरिकांची चिथावणीखोर भूमिका राहिली आहे. ९ मेपासून जवळपास प्रतिदिन गोळीबार किंवा घुसखोरी रोखण्यावरून हिंसाचाराची घटना घडत आहे. आसामपासून बंगालपर्यंतच्या सीमेवर हे चित्र दिसत आहे. या पार्श्‍वभूमीवर बांगलादेशाचे सीमा सुरक्षा दल सीमावर्ती भागातील लोकांना समजावून सांगण्यासाठी मोहीम राबवत आहे.

१. ‘बीजीबी’चा दावा आहे की, त्यांच्या गस्ती पथकाने आणि स्थानिक ग्रामस्थांनी १६ मे या दिवशी बिजॉयनगर (ब्राह्मणबारिया) येथे सीमा सुरक्षा दलाकडून ७५० भारतीय नागरिकांना बांगलादेशी हद्दीत ढकलण्याचा प्रयत्न हाणून पाडला. यानंतर १८ मे या दिवशी सोनारहाट सीमा क्षेत्रात गोळीबार झाल्याचा दावा बीजीबीने केला आहे.

२. बीजीबीने ‘झिरो पॉईंट’ नियमांचे उल्लंघन केल्याचा हवाला देत सीमा सुरक्षा दलावर अनेक आरोप केले. करीमगंजमधील झिरो पॉईंटवर २५ मे या दिवशी पुन्हा एकदा दोघांमधील तणाव वाढला. दोघांतील चालू असलेल्या चकमकीत बांगलादेशी ग्रामस्थ आक्रमकपणे पुढे येतात आणि बीजीबीसाठी ‘ढाल’ बनतात.

३. सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर बीजीबीने ब्राह्मणबारिया सीमेवर मेगाफोनचा वापर करून जनजागृती मोहीम चालू केली आहे. यामध्ये स्थानिक रहिवाशांना घुसखोरी आणि अनुमतीविना सीमा ओलांडण्याबाबत सतर्क केले जात आहे. बीजीबीचे लेफ्टनंट कर्नल शरीफुल इस्लाम यांनी सांगितले की, ही मोहीम स्थानिक लोकांना सतर्क रहाण्याचे आणि सीमा सुरक्षा राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करते.