ज्योतिषशास्त्राची अपकीर्ती : वैज्ञानिक अज्ञान कि वैचारिक आतंकवाद ?

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली सध्या ज्योतिषशास्त्र आणि फलज्योतिषशास्त्र यांवर जी चिखलफेक केली जात आहे, ती केवळ निषेधार्ह नसून पूर्णतः बेकायदेशीर आहे.  स्वतःला पुरोगामी म्हणवणारे काही साम्यवादी घटक भारतीय संस्कृती आणि शास्त्र यांचा अवमान करण्यात धन्यता मानत आहेत; मात्र त्यांनी हे लक्षात ठेवावे की, भारत हा राज्यघटनेने चालणारा देश आहे आणि राज्यघटनेने प्रत्येक शास्त्र अन् विश्वास यांना संरक्षण दिले आहे.

१. सर्वोच्च न्यायालयाची चपराक

श्री. प्रसाद पंडित

ज्योतिष हे विज्ञानच ! वर्ष २००४ मध्ये जेव्हा काही लोकांनी ज्योतिषशास्त्राला अभ्यासक्रमातून हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने (‘कुमुद चंद्र भार्गव विरुद्ध युनियन ऑफ इंडिया’ या खटल्यात) स्पष्ट निकाल दिला होता, ‘ज्योतिषशास्त्र हे खगोलशास्त्राप्रमाणेच एक प्रगत शास्त्र आहे आणि ते मानवी कल्याणासाठी वापरले जाणारे प्राचीन भारतीय ज्ञान आहे.’ सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अंतिम असतांनाही ‘ज्योतिषशास्त्राला ‘भोंदूगिरी’ म्हणणे, हा थेट न्यायालयीन अवमान आहे.’

२. जादूटोणाविरोधी कायद्याचा गैरवापर थांबवा !

वर्ष २०१३ च्या ‘महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायदा’ हा अघोरी प्रथा आणि नरबळी रोखण्यासाठी आहे. या कायद्याच्या ‘अनुसूची’ (Schedule)मध्ये कुठेही ज्योतिषशास्त्राचा समावेश नाही. उलट कायद्याचे कलम १३ स्पष्ट करते, ‘परंपरागत चालत आलेले धार्मिक विधी आणि शास्त्र यांना हा कायदा बाधक नाही.’ असे असतांना केवळ द्वेषापोटी ज्योतिषांना कायद्याची भीती दाखवणे, हा ‘खंडणीखोर’ वृत्तीचा प्रकार आहे, ज्यावर कडक पोलीस कारवाई होऊ शकते.

३. साम्यवादी दृष्टीकोन आणि विज्ञानाचा बुरखा

जे लोक विज्ञानाचा दाखला देतात, त्यांना हे ठाऊक असावे की, आधुनिक विज्ञानातील ‘ग्रॅव्हिटेशन’ (गुरुत्वाकर्षण) आणि ‘कॉस्मिक रेंज’ (विश्वातील किरणे) यांचा मानवी शरिरावर परिणाम होतो, हे सिद्ध झाले आहे.

‘फलज्योतिष’ हे याच खगोलीय स्थितीचे गणित मांडते. जर हवामान खात्याने वर्तवलेला पावसाचा अनुमान चुकला, तर त्याला ‘भोंदूगिरी’ म्हणण्याचे धाडस हे लोक दाखवत नाहीत, मग केवळ हिंदु धर्माशी संबंधित आहे; म्हणून ज्योतिषशास्त्रावर टीका करणे, हा निव्वळ वैचारिक आतंकवाद आहे.

४. कायदेशीर कारवाईची चेतावणी

प्रज्ञापुरी ज्ञानपीठ, अक्कलकोट या माध्यमातून आम्ही स्पष्ट सूचित करतो, ‘भारतीय दंड संहिते’ (आताची ‘भारतीय न्याय संहिता’)च्या अंतर्गत कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणे (कलम २९९) आणि एखाद्या सन्माननीय शास्त्राची सार्वजनिक अपकीर्ती करणे, हा फौजदारी गुन्हा आहे. यापुढे जर कुणीही ज्योतिषशास्त्राला  ‘भोंदूगिरी’ किंवा ‘जादूटोणा’ म्हणून हिणवले, तर ती व्यक्ती आणि संघटना यांवर मानहानीचा अन् धार्मिक तेढ निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवला जाईल.’

५. निष्कर्ष

अंधश्रद्धा निर्मूलन व्हायलाच हवे; पण त्या नावाखाली भारतीय ऋषिमुनींच्या सहस्रो वर्षांच्या संशोधनाला (ज्योतिषशास्त्राला) अपकीर्त करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. शास्त्राची शक्ती गणितात आहे, ती कुणाच्या प्रमाणपत्रावर अवलंबून नाही.

– श्री. प्रसाद पंडित (गुरुजी), अध्यक्ष, प्रज्ञापुरी ज्ञानपीठ, अक्कलकोट.