(म्हणे) ‘भारताला इतिहासाच्या पानात ढकलून देऊ !’ – Khawaja Asif

भारतीय सैन्यदलप्रमुखांच्या चेतावणीवर पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांची पोकळ धमकी

पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताचे सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानचा इतिहास-भूगोल बिघडवण्याच्या दिलेल्या चेतावणीनंतर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. आसिफ म्हणाले की, भारताने पाकिस्तानविरुद्ध पुन्हा कोणतेही धाडस करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना इतिहासाच्या पानात ढकलले जाईल. भारताचा भूगोल पालटाला जाईल, अशी धमकी दिली. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. जनरल द्विवेदी म्हणाले होते की, पाकिस्तानला हे ठरवावे लागेल की, त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे कि इतिहासाचा ? त्यावर आसिफ यांनी हे हास्यास्पद विधान केले.

१. आसिफ म्हणाले की, अशा प्रकारची विधाने करून भारतीय सैन्यदलप्रमुख स्वतःची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

२. आसिफ म्हणाले की, भारताचे आता बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका यांसारख्या शेजार्‍यांशी पूर्वीसारखे संबंध राहिलेले नाहीत अन् भारताला परराष्ट्र धोरणाच्या आघाडीवर नामुष्कीचा सामना करावा लागत आहे. (पाकला जगात कुणी कुत्रेही विचारत नसतांना अशा प्रकारचे वक्तव्य करणे हेच हास्यास्पद आहे ! – संपादक) इस्रायल या क्षेत्रात भारताव्यतिरिक्त इतर कुणालाही अधिक शक्तीशाली पाहू इच्छित नाही.

३. अलीकडेच सिंधू जल करारावर स्थायी लवाद न्यायालयाने पाकिस्तानच्या बाजूने निकाल दिला आहे. आसिफ यांनी सांगितले की, हा करार एकतर्फी स्थगित केला जाऊ शकत नाही आणि वादाच्या सोडवणुकीसाठी सशक्त यंत्रणा अस्तित्वात आहे.

संघाचे सहकार्यवाह होसबाळे यांच्या विधानावरून भारत सरकारवर टीका !

आसिफ यांनी रा.स्व. संघाचे सहकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या विधानावरही भाष्य केले, ज्यामध्ये त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात संवादाची खिडकी उघडी ठेवण्याविषयी म्हटले होते. आसिफ म्हणाले की, भारतामध्ये सैन्य आणि नागरी समाज (सिव्हिल सोसायटी) यांची भूमिका वेगवेगळी आहे. भारतात सरकारविरोधात आवाज उठत आहेत. (भारताची चिंता करण्यापेक्षा आसिफ यांनी त्यांच्या समाजाची होत असलेली फरफट सावरण्याचा प्रयत्न करावा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

‘ऑपरेशन सिंदूर’पूर्वीही पाकचे संरक्षणमंत्री आणि अन्य मंत्री अशाच प्रकारच्या पोकळ धमक्या देत होते. आताही ते तेच करत आहेत. पाकिस्तानचे २ तुकडे करून भारताने पाकचा नकाशा पालटला होता आणि येत्या काही वर्षांत पाकचे ५ तुकडे (बलुचिस्तान, खैबर पख्तुनख्वा, पश्‍चिम पंजाब, सराइकिस्तान आणि गिल्गिट बाल्टिस्तान) होऊन पाक नावाचा देश शिल्लक रहाणार नाही, हे पाकने लक्षात घ्यावे !