पोलिसांनी एका वर्षात २० कॉल सेंटर्सवर धाडी घालून ५० युवकांना घेतले कह्यात

गोव्यात बनावट कॉल सेंटर्समध्ये वाढ

प्रतीकात्मक छायाचित्र

पणजी, १० मे (वार्ता.) – गोव्यात गतवर्षी बनावट कॉल सेंटर्समध्ये वाढ झाली आहे. गोवा पोलिसांनी वर्ष २०२५ मध्ये २० बनावट कॉल सेंटर्सवर धाडी घालून यामध्ये काम करणार्‍या सुमारे ५० हून अधिक कर्मचार्‍यांना कह्यात घेतले आहे. हे युवक २५ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत आणि बहुतेक जण महाराष्ट्र, गुजरात, देहली, हरियाणा, नागालँड आणि मणीपूर येथील आहेत. सर्वाधिक युवक गुजरात राज्यातील आहेत. गोवा एक पर्यटनस्थळ असल्याने आणि गोव्यात रात्री उशिरापर्यंत होणार्‍या पार्ट्या, आठवड्याच्या शेवटी होणार्‍या पार्ट्या आणि मौजमजा यांमुळे परराज्यांतील युवक बनावट कॉल सेंटर्समध्ये काम करण्यासाठी आकर्षित होत आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

या बनावट कॉल सेंटरमधून अमेरिकी नागरिकांना कर्जाला संमती देणे, वैद्यकीय देयकाची आगाऊ रक्कम देणे आदी बनावट योजनांचे आमीष दाखवून फसवले जाते. बनावट कॉल सेंटर चालवणार्‍या मालकांचा परदेशातील संस्थांशी करार असतो आणि यामुळे परदेशी संस्था त्यांना आलेले दूरभाष गोव्यात वळवतात. दूरभाष गोव्यात वळवणार्‍याला मोबदला म्हणून प्रतिकॉल ४ सहस्र रुपये दिले जातात.

आलीशान जीवनशैलीमुळे गोव्यातील बनावट कॉल सेंटर्समध्ये काम करण्यास युवक आकर्षिले जातात !

कॉल सेंटरवर पदवीधर, इंग्रजी चांगली बोलता येणारे आणि दूरभाषवर इतरांवर प्रभाव टाकू शकतील, अशा युवकांनाच नोकरी दिली जाते. युवकांची भरती ‘बनावट नोकरी भरती संस्थां’च्या माध्यमातून किंवा सामाजिक माध्यमे यांमधून केली जाते. वास्तविक बनावट कॉल सेंटर्स भारतभर आहेत; मात्र बरेच युवक गोव्यातील आलीशान जीवनशैलीमुळे गोव्यातील बनावट कॉल सेंटरमध्ये काम करणे पसंत करत आहेत. या ठिकाणी काम करणार्‍या युवकांना प्रतिमास १५ ते २५ सहस्र रुपये वेतन आणि बनावट कॉल सेंटरच्या मालकाच्या खात्यामध्ये किती पैसे जमा केले यावर प्रोत्साहन रक्कम (इन्सेंटीव्ह) दिली जाते. बनावट कॉल सेंटरमधील युवकाने जर एखाद्या अमेरिकी नागरिकाची १ कोटी रुपयांची फसवणूक केल्यास कॉल सेंटरमधील युवकाला त्याच्या मोबदल्यात कित्येक लाख रुपयांचा प्रोत्साहन निधी मिळतो.

कॉल सेंटर्स म्हणजे काय ? 

कॉल सेंटरला ‘व्यवसाय प्रक्रिया बाह्यसेवा’ असेही म्हणतात. मोठी आस्थापने (उदा. बँक, टेलिकॉम, ई-कॉमर्स) त्यांची काही कामे, जसे की ग्राहकांच्या तक्रारी सोडवणे किंवा उत्पादनांची माहिती देणे, ही तिसर्‍या आस्थापनाला म्हणजेच ‘कॉल सेंटर’ला सोपवतात. येथे तरुण मुले-मुली दूरभाषद्वारे ग्राहकांशी संवाद साधतात.