गुरववाडी, कलमठ येथे धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांनी उधळला

पोलीस घटनास्थळी : कलमठ येथे तणावपूर्ण वातावरण

धर्मांतर

कणकवली – तालुक्यातील गुरववाडी, कलमठ येथे ख्रिस्त्यांकडून होत असलेला हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. ही घटना रविवार, ३ मे या दिवशी सकाळी घडली आहे. या वेळी ग्रामस्थ आणि ख्रिस्ती धर्मप्रचारक यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन तणाव निर्माण झाला; मात्र पोलिसांना याविषयी समजताच ते घटनास्थळी आले आणि ख्रिस्ती धर्मप्रचारकांना कह्यात घेतले. त्यामुळे येथील तणावपूर्ण वातावरण निवळले. ‘संबंधितांवर गुन्हे नोंद करा’, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.

गावाबाहेरील काही व्यक्ती कलमठ गावात येऊन स्थानिक नागरिकांना प्रलोभने दाखवत धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. यानंतर गावकर्‍यांनी तातडीने एकत्र येत संबंधितांना जाब विचारला, तसेच हा प्रकार पोलिसांना कळवला. माहिती मिळताच कणकवली पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्षता घेतली. संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी कह्यात घेतल्याचे समजते.

प्रशासनाने संबंधितांवर कडक कारवाई करण्याची सरपंचांची मागणी

खोट्या आमिषांना गोरगरीब लोक बळी पडत आहेत. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये अप्रसन्नता व्यक्त होत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी सरपंच संदीप मेस्त्री आणि स्वप्निल चिंदरकर यांनी केली. ‘संबंधितांवर गुन्हे नोंद करावेत. यांची तक्रार पोलिसांनी द्यावी’, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.

या वेळी येथे आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर, ‘तुम्ही इथे काय करता ? एकाच धर्माचा प्रसार का करता ? जर ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत असाल, तर या ठिकाणी एक तरी ख्रिस्ती आहे का ? हिंदु धर्मियांना बोलवून या ठिकाणी खोटी आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करायचे आहे का ?’, अशा प्रश्नांचा भडीमार करण्यात आला.

या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, माजी उपसरपंच स्वप्निल चिंदरकर, विजय चिंदरकर, अनुप वारंग, परेश आचरेकर, समर्थ कोरगावकर, पपू यादव, सदानंद चव्हाण, विनय गुरव, सागर पवार, प्रणय शिर्के, सूरज लोके, प्रसाद देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.