DD Journalist Ashok Shrivastav : राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यावरून दूरदर्शनचे पत्रकार अशोक श्रीवास्तव यांच्याविरुद्ध तेलंगाणामध्ये गुन्हा नोंद

राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चपलेच्या धुळीच्या बरोबरीचेही नसल्याचे केले होते विधान

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) / भाग्यनगर (तेलंगाणा) – लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याच्या प्रकरणी तेलंगाणा पोलिसांनी दूरदर्शनचे पत्रकार अशोक श्रीवास्तव यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी तेलंगाणा पोलिसांनी गाझियाबाद येथे श्रीवास्तव यांच्या घरी जाऊन त्यांना नोटीस बजावली. या वेळी श्रीवास्तव घरी नव्हते.

भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यासाठी भाग्यनगरमधील २ पोलीस उपनिरीक्षकांचे पथक गाझियाबादमधील लिंक रोड पोलीस ठाण्याच्या सीमेतील सूर्यनगर भागात पोचले होते.

काय म्हणाले होते अशोक श्रीवास्तव ?

‘डीडी न्यूज’वाहिनीवरील एका चर्चेमध्ये भाजपचे प्रवक्ते तुहिन सिन्हा, राजकीय विश्लेषक सय्यद जावेद आणि इतर पाहुणे यांच्या उपस्थितीत श्रीवास्तव यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा संदर्भ देत श्रीवास्तव म्हणाले होते की, ‘तुम्ही सावरकरांच्या चपलेच्या टोकाच्याही बरोबरीचे नाही. तुम्ही त्यांच्या चपलेच्या धुळीच्या हजारव्या भागाइतकेही नाही. राहुल गांधी हे वीर सावरकरांच्या चपलेच्या तळाला लागलेल्या धुळीच्या कणासारखेही नाहीत.’

संपादकीय भूमिका

तेलंगाणामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने अशा प्रकारचा गुन्हा नोंदवला जाणे, यात आश्चर्य ते काय ?