Gulshan Colony Raid : कोलकात्यातील ‘मिनी बांगलादेश’ असलेल्या ‘गुलशन कॉलनी’वर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी !

  • रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा अड्डा !

  • २ लाख वस्ती असलेल्या या भागात अभावानेच अधिकृत भारतीय मतदार !

  • वर्ष २०११ मध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार येताच शेकडो इमारतींची उभारणी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी

कोलकाता (बंगाल) – बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर, तसेच हिंसक घटना यांच्या गुन्हेगारी कारवायांचे केंद्र बनलेल्या शहरातील कुख्यात ‘गुलशन कॉलनी’ परिसरात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने नुकत्याच अनेक धाडी घातल्या. वर्ष २०११ मध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर या कॉलनीची निर्मिती आणि विस्तार झाला. अवघ्या काही महिन्यांतच येथे शेकडो इमारती उभारण्यात आल्या. कोलकाता महानगरपालिकेकडे या परिसराची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नाही, असे आरोप केले जात आहेत. तृणमूलच्या नेत्यांच्या पाठिंब्याने या भागात बांगलादेशी नागरिकांना वसवण्यात आले आहे, असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.

सखोल पुनरावलोकन प्रक्रियेतून समोर आले भयावह वास्तव !

गुलशन कॉलनी या मुसलमानबहुल परिसरात २ लाख लोक रहात असून येथील ९० टक्के लोक हे अनधिकृत असल्याचे पुरावे गेल्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या मतदारसूचीच्या सखोल पुनरावलोकन प्रक्रियेतून समोर आले. हे लोक अधिकृतपणे नोंदणीकृत मतदार नव्हते आणि मूळचे बांगलादेशाचे रहिवासी होते; तरीही त्यांच्याकडे मतदार ओळखपत्रे असल्याचा दावा ते करत होते.

गुलशन कॉलनीत मोठ्या प्रमाणात सैनिक तैनात !

बंगालमधील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी आणि कोणत्याही संभाव्य आव्हानांना त्वरित प्रतिसाद देता यावा, या उद्देशाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मतदानाच्या दुसर्‍या टप्प्यापूर्वीच गुलशन कॉलनी परिसरात मोठ्या संख्येने सैनिक तैनात करण्यात आले होते. ही पथके पूर्व वर्धमान, दक्षिण २४ परगणा, हुगळी, नादिया आणि हावडा या जिल्ह्यांतही तैनात करण्यात आली. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार कच्च्या बाँबचा साठा, अवैध शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करणे आदी प्रकरणांची ही पथके गांभीर्याने चौकशी करत आहेत.

केंद्रीय संरक्षण यंत्रणा असतांना गुलशन कॉलनीशी संबंधित घडलेल्या घटना !

१. कोलकाता पोलिसांनी गुलशन कॉलनीजवळ असलेल्या उत्तर काशीपूर भागातील भांगर क्षेत्रातून ७९ स्थानिक बनावटीची स्फोटके जप्त केली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

२. येथूनच जवळ असलेल्या ‘माझेरहाट’ (पोईलेपारा) वस्तीमध्ये एका दफनभूमीजवळ असलेल्या एका पडक्या घरात अज्ञात व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात स्फोटके ठेवली होती. हा संपूर्ण परिसर ‘अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस’चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

३. या दोन्ही घटनांमुळे ‘गुलशन कॉलनी’कडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. प्राप्त अहवालांनुसार या वस्तीतील साधारण ९० टक्के रहिवासी हे ‘बाहेरचे’ लोक होते आणि ते अनेक वर्षांपासून या परिसरात वास्तव्य करून होते.

भाजपचे नेते, तसेच बंगाल पोलीस यांनी सांगितले ‘गुलशन कॉलनी’चे वास्तव !

१. भाजपचे ज्येष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी असा आरोप केला की, घुसखोर दीर्घकाळापासून गुलशन कॉलनीत वास्तव्य करून आहेत.

२. केंद्रीय मंत्री डॉ. सुकांत मजुमदार यांनी वर्ष २०२४ मध्ये ‘१३ वर्षांतील लक्षणीय लोकसंख्याशास्त्रीय पालटां’कडे लक्ष वेधले होते. ते म्हणाले होते की, हा परिसर बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या यांच्यासाठी एक केंद्र बनला आहे. यामुळे गुन्हेगारी अन् अराजकतेला खतपाणी मिळत आहे. या माध्यमातून ‘मिनी-बांग्लादेश’ उदयास आला आहे, असे दिसते.

३. कोलकाता पोलिसांच्या एका अधिकार्‍याने सांगितले, गेल्या काही वर्षांत गुलशन कॉलनी गुन्हेगारी कारवायांचा अड्डा आणि गुन्हेगारांसाठी एक सुरक्षित आश्रयस्थान बनली आहे. यातील अनेक गुन्हेगार राज्याबाहेरून, तसेच देशाबाहेरून येतात. येथील अंधार्‍या गल्ल्या आणि एकमेकांना लागून असलेल्या इमारती यांमुळे गुन्हेगारांवर अचानक धाडी घातल्यानंतर त्यांना पळून जाणे अथवा लपणे सोपे जाते.

स्थानिक हिंदु नागरिकांना होत असलेला त्रास !

१. जवळपास प्रत्येक आठवड्याला हिंसक घटना घडतात. आजूबाजूच्या परिसरातील लोकांनाही अशाच भीतीचा सामना करावा लागतो. ते स्वतःची वाहने घराबाहेर लावणे आणि रात्री उशिरा रस्त्यावर फिरणे टाळतात.

२. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, बंदुका आणि शस्त्रे दाखवली जात असल्याने, तसेच गोळीबार होत असल्याने जवळच्या परिसरातील लोकही भयभीत स्थितीत असतात.

संपादकीय भूमिका

बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणार्‍या तृणमूल काँग्रेसचा बंगालच्या हिंदूंनी या निवडणुकीत तरी लोकशाहीद्वारे दिलेला आश्रय काढून घेतला असावा, अशी आशा आहे. निवडणुकीचा काहीही निकाल आला, तरी तृणमूल काँग्रेसवर आता बंदीच आणली गेली पाहिजे !