छत्रपती शिवरायांचा अवमान स्वप्नातही करू शकत नाही; भावना दुखावल्यास क्षमा मागतो ! – Pandit Dhirendra Krishna Shastri

छत्रपती शिवाजी महाराज व पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत. त्यांच्यामुळेच आज देशात हिंदुत्व जिवंत आहे. अशा थोर महापुरुषांचा अवमान करण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही. तरीही माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी अंतःकरणातून क्षमा मागतो, अशा शब्दांत बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. येथील प्रवचनात छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या संदर्भातील विधानावरून निर्माण झालेल्या वादानंतर त्यांनी वरील विधान केले.

ते पुढे म्हणाले की, मी माझ्या शब्दांतून महाराजांप्रती असलेला आदरच व्यक्त केला; मात्र काही लोकांनी माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला. ज्यांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही ‘हिंदु राष्ट्र’ स्थापण्याचा संकल्प केला आहे, त्यांची निंदा आम्ही कधीच सहन करणार नाही. जे शिवरायांना मानतात, ते सर्व आमचेच बांधव आहेत. अशा सूत्रांवरून आपण आपापसात लढलो, तर त्याचा लाभ केवळ धर्मद्वेष्ट्यांनाच होईल. ‘प्रत्येकाने एक मुलगा संघाला द्यावा’ या विधानाचा अर्थ काय ? तर मुलाने कट्टर राष्ट्रभक्त आणि सनातनी विचारांचे व्हावे, हाच माझा हेतू होता. तो जिल्हाधिकारी असो, शिक्षक असो वा इतर काही; पण त्याचे विचार कट्टर सनातनी असायला हवेत.

नेमका वाद काय होता ?

नागपूरमधील एका कार्यक्रमात पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी ‘युद्धामुळे थकल्यावर छत्रपती शिवरायांनी स्वतःचा मुकुट समर्थांच्या चरणी अर्पण केला होता’, असा उल्लेख केला होता. यावरून काही संघटनांनी इतिहासाची मोडतोड झाल्याचा आरोप करत त्यांच्यावर टीका केली होती.

संपादकीय भूमिका

  • पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री हे सातत्याने हिंदु राष्ट्र आणि सनातन धर्म यांचा पुरस्कार करत आहेत. अशा वेळी त्यांच्या एखाद्या विधानाचा आधार घेऊन हिंदु समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र धर्मद्रोह्यांकडून रचले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही !
  • क्षमा मागून त्यांनी स्वतःचा मोठेपणा सिद्ध केलाच आहे. आता इतरांनीही हा वाद न ताणता हिंदु ऐक्यासाठी संघटित होणे ही काळाची आवश्यकता आहे !