भारतातील विकासाचा आरंभ कि विनाशाची मुहूर्तमेढ ?

१. इंग्रज भारतात येण्यापूर्वीच भारत जगातील मोठा देश असणे

‘गोरे (इंग्रजांचे) पाय या भूमीवर लागण्याआधी भारत हा जगातील एक मोठा व्यापारी देश होता. तो उद्योगप्रधान देश होता. केवळ शेतीप्रधान नव्हे. याविषयी इतिहासात असंख्य साक्षी आहेत.

२. भारतात युरोपपेक्षाही मोठ्या नौकांची निर्मिती होणे

१६ व्या शतकाच्या एका इटालियन व्यक्तीची नोंद आहे. दख्खनच्या बंदरात सिद्ध होणार्‍या जहाजाइतकी आकाराने मोठी जहाजे त्या काळी युरोपामधेही नव्हती. नेपोलियनच्या लढाईत इंग्रज नौदल, सेनानी आपल्या ध्वजासह ज्या जहाजातून युद्ध करत होते, तेच मुळी भारताच्या पश्चिम किनार्‍यावरच्या बंदरात निर्माण केलेले होते.

३. इंग्रजांनी भारताला पिळवटणे

‘लॉर्ड डलहौसीने रेल्वे, तारयंत्र इत्यादी सुधारणा भारतात केल्या’, असे इतिहासात शिकवले जाते. वास्तविक परिस्थिती वेगळी होती. इंग्रजांना भारताविषयी रतिमात्र सहानभूती नव्हती. भारताच्या कल्याणाची गोष्ट तर दूरच; पण भारताला पिळून पिळवटून मिळेल, ते हिसकावून घ्यायचे हीच इंग्रजांची भारताविषयी नीती होती; परंतु डलहौसीच्या कारकीर्दीत ब्रिटनमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की, भारतात रेल्वे, तारयंत्र चालू करण्याविना गतीच नव्हती. हे सगळे करणे क्रमप्राप्त होते.

४. ब्रिटनची उत्पादने भारतात पुष्कळ महागात विक्रीसाठी; पण उत्पादनांसाठीचा कच्चा माल भारतातून अल्प मूल्य देऊन ब्रिटनला घेऊन जाणे

वर्ष १७५० ते १८५० च्या काळात इंग्लंड औद्योगिकीकरणाच्या शिखरावर होते. औद्योगिक क्रांती कळसाला पोचली होती. प्रचंड कारखाने, उद्योग, अद्ययावत तंत्रज्ञान (‘टेक्नॉलॉजी’) त्यामुळे रेल्वे आणि तारयंत्राच्या साहित्याचे अमाप उत्पादन व्हायचे. त्यांना युरोप आणि अमेरिकेची बाजारपेठ होती; पण तीही या प्रचंड उत्पादनाच्या तुलनेत अपुरी होती; म्हणूनच भारतात रेल्वे अन् तारयंत्रे चालू झाली. ब्रिटनला बाजारपेठ मिळाली. सगळा माल भारतात पुष्कळ महाग आणि हव्या त्या किंमतीत विकता येऊ लागला. रेल्वे चालू झाल्यामुळे भारताच्या कानाकोपर्‍यांतून कच्चा माल गोळा करता येऊन सहज, जलद, अल्प व्ययात आणि अल्प मूल्य देऊन ब्रिटनमध्ये पाठवता येऊ लागला. त्याच कच्च्या मालाचा वापर करून ब्रिटनमधील उद्योगपती यंत्रे बनवून भारतात पाठवू लागले. ब्रिटन या काळात औद्योगिक क्रांतीच्या कळसाला होते; म्हणून अधिक धनवान होते. युरोप आणि अमेरिकेत औद्योगिकीकरण नंतर झाले.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २०२२)