छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही ! – आमदार संजय गायकवाड, शिवसेना

कॉ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकाच्या प्रकाशकाला फटकारले !

‘कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता’ हे वादग्रस्त पुस्तक आणि शिवसेनेचे आमदार श्री. संजय गायकवाड

बुलढाणा – हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे आणि हिंदूंचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान करण्यात आला. साम्यवादी विचारसरणीचे दिवंगत नेते कॉ. गोविंद पानसरे यांनी ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता ?’, या पुस्तकाच्या वादग्रस्त शीर्षकावरून येथील शिवसेनेचे आमदार श्री. संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना तीव्र शब्दांत फटकारले. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही. त्यांचा अनादर करणार्‍यांना आणि त्यांना एकेरी संबोधणार्‍यांना वेळीच धडा शिकवला पाहिजे’, अशी भूमिका त्यांनी घेतली. श्री. गायकवाड यांनी चित्रफीत प्रसारित करून भूमिका मांडली.

नेमके काय आहे प्रकरण ?

‘जागतिक पुस्तक दिना’चे निमित्त साधून या पुस्तकाचा विषय पुन्हा समोर आला. शिवसेनेचे आमदार श्री. संजय गायकवाड यांनी प्रकाशकाशी संपर्क साधला. या वेळी ते म्हणाले की, ‘शिवाजी कोण होता ?’, हे पुस्तक ३७ वर्षांपूर्वी लिहिलेले असले, तरी पुस्तकाच्या शीर्षकात महाराजांचा उल्लेख एकेरी का ? छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणारे गोविंद पानसरे कोण होते ? मला हे पुस्तक वाचायची आवश्यकता नाही. तुमच्यासारखे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी भाषेत उल्लेख करतात.’’

या वेळी प्रकाशक प्रशांत आंबी म्हणाले, ‘‘शिवाजी कोण होता ?’, हे पुस्तक मी नव्हे, तर गोविंद पानसरे यांनी लिहिले आहे. हे पुस्तक वर्ष १९८८ मध्ये प्रकाशित झाले होते. या पुस्तकात शिवरायांचा अवमान करण्याचा कोणताही हेतू नाही, तुम्ही आधी ते पुस्तक वाचा.’’

तथापि ‘‘महाराजांच्या सन्मानापुढे अन्य काहीही श्रेष्ठ नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानासाठी आपण कोणत्याही परिणामांची तमा बाळगणार नाही’’, असे सांगत आमदार गायकवाड यांनी त्यांना कडक शब्दांत ताकीद दिली.

आमदार गायकवाड यांच्या विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा जळफळाट !

या प्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आमदार गायकवाड यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘गायकवाड यांनी जिल्ह्याचे नाव अपकीर्त करण्याचा विडा उचलला आहे. एका लोकप्रतिनिधीने अशी भाषा वापरणे गंभीर आहे. छत्रपती शिवरायांच्या मूल्यांना तडा देण्याचे काम यातून होत आहे.’’ (शिवसेनेचे आमदार श्री. संजय गायकवाड यांची प्रतिमा मलीन करण्याचाच हा प्रयत्न आहे. धर्मासाठी आक्रमक होणार्‍या लोकप्रतिनिधीला ‘अपात्र’ ठरवणे ही काँग्रेसची जुनी रणनीती आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची मूळ विचारधारा सोडून केवळ मतांसाठी लांगूलचालन केले, त्यांना महाराजांच्या सन्मानाचे मूल्य काय कळणार ? – संपादक)

‘पानसरे यांचे जे झाले तेच करू’, अशी धमकी गायकवाड यांनी दिली आहे. या विधानाची सखोल चौकशी व्हावी’, अशी मागणी सपकाळ यांनी केली. (पुस्तकाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा प्रयत्न केला असतांना त्याविषयी चकार शब्द न काढणारे सपकाळ ! पुस्तकाच्या शीर्षकात महाराजांच्या झालेल्या अनादराविषयी सपकाळ गप्प का ? – संपादक)

(म्हणे) ‘कॉ. गोविंद पानसरे यांच्या पुस्तकाचे बुलढाण्यात जाहीर वाचन करणार !’ – अधिवक्ता असीम सरोदे

पुणे – ‘कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता’ या वादग्रस्त पुस्तकाचे बुलढाणा येथे जाहीर वाचन करणार आहे. शिवसेनेचे आमदार श्री. संजय गायकवाड काय करतात, ते बघू’, असे विधान अधिवक्ता असीम सरोदे यांनी केले आहे.

श्री. गायकवाड यांच्या विरोधात लवकरच पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

  • अशा विघातक प्रवृत्तींनी समाजात तेढ निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले असल्यास प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी त्यावर तात्काळ बंदी घातली पाहिजे !
  • हिंदूंच्या विरोधात सर्व पुरोगामी, साम्यवादी आणि हिंदुद्वेष्टे एकत्र येत आहेत, हे ओळखून हिंदूंनीही संघटित होणे आवश्यक !