इराण युद्धात भारत शांतता प्रस्थापित करणार ?

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे जर्मनीतून मोठे संकेत

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

बर्लिन (जर्मनी) – भारताने पश्चिम आशियातील संकटात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत; पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. कदाचित् उद्या अशी वेळ येईल, जेव्हा भारत यात स्वतःची भूमिका बजावेल आणि यशस्वीही होईल. आम्ही ही शक्यता नाकारू शकत नाही. पंतप्रधानांनी दोन्ही देशांना युद्ध संपवण्याचे आवाहन केले आहे. राजनैतिक गोष्टींमध्ये आमच्या पंतप्रधानांचा दृष्टीकोन अत्यंत संतुलित आहे, असे विधान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केले.

संरक्षण मंत्री २१ ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत जर्मनीच्या ३ दिवसांच्या अधिकृत दौर्‍यावर आहेत. दोन्ही देशांमधील धोरणात्मक संरक्षण भागीदारी अधिक दृढ करणे आणि संरक्षण औद्योगिक सहकार्यासाठी नवीन आराखडा सिद्ध करणे, हा या दौर्‍याचा मुख्य उद्देश आहे.

भारताचा अत्यंत संतुलित दृष्टीकोन !

राजनाथ सिंह यांनी बर्लिनमध्ये सांगितले की, जेव्हा पंतप्रधान मोदी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांना भेटले, तेव्हा त्यांनी यावर चर्चा केली. इतकेच नाही, तर जेव्हा ते ट्रम्प यांना भेटले, तेव्हाही त्यांनी यावर चर्चा केली आणि यातून काहीतरी तोडगा काढला पाहिजे, असे सांगितले. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून कोणत्याही देशाची नौका जाऊ शकत नव्हती. अशा वेळी जर कुणी आपल्या ७-८ नौकांसह तिथून जाऊ शकले असेल, तर तो केवळ भारत होता. याचा अर्थ असा नाही की, अमेरिका भारताला आपला शत्रू मानतो किंवा इराण भारताला शत्रू मानतो. उलट हा भारताचा अत्यंत संतुलित दृष्टीकोन आहे.