‘धर्मांध’ ठरवलेल्या २० वारकर्‍यांचा हिंदु धर्माचे पाईक म्हणून सन्मान होणार !

  • राष्ट्रवादी काँग्रेसने २० वारकर्‍यांना धर्मांध ठरवून त्यांची नावे घोषित केल्याचे प्रकरण

  • विश्व हिंदु परिषदेची पत्रकार परिषद

डावीकडून ह.भ.प. सुनील रानकर महाराज, श्री श्री शिवरूपानंद स्वामी, स्वामी भारतानंद सरस्वती, ह.भ.प. सुभाष महाराज तरणे आणि अधिवक्त्या शीतल भोसले

मुंबई – हिंदु धर्माचे पाईक असल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी २० वारकर्‍यांना  धर्मांध ठरवून त्यांची नावे घोषित केली आहेत. शरद पवार यांनी वारकर्‍यांमध्ये ६० टक्के धर्मांध शिरले असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून विकास लवांडे यांनी ही नावे घोषित केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘धर्मांध’ ठरवलेल्या २० वारकर्‍यांचा वारकर्‍यांच्या वतीने सन्मान करण्याची घोषणा ‘अखिल भारतीय संत समिती’च्या कोकण प्रांताचे सहमंत्री स्वामी श्री श्री शिवरूपानंद स्वामी यांनी केली.

२१ एप्रिल या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  या वेळी अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री स्वामी भारतानंद सरस्वती, अधिवक्त्या शीतल भोसले, ह.भ.प. सुनील रानकर महाराज, सुभाष महाराज तरणे उपस्थित होते. वारकर्‍यांना धर्मांध ठरवण्याच्या या हिंदुद्वेषाचा विश्व हिंदु परिषदेने निषेध केला.

ध्वज भगवा असलेले वारकरी हिंदु धर्मापासून वेगळे कसे ? – स्वामी भारतानंद सरस्वती, महामंत्री, अखिल भारतीय संत समिती

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी विकास लवांडे यांनी वक्तव्य केले. वारकरी संप्रदायाला सनातन धर्मापासून तोडण्याचे हे षड्यंत्र आहे. सनातन धर्माला संपवण्यासाठी विदेशातून कार्यरत असलेल्यांचे ते हस्तक आहेत. वेद आणि यज्ञ यांवरील टीका हीच त्यांची पुरोगामित्वाची व्याख्या आहे. हिंदू जागृत होत आहेत, ही त्यांची पोटदुखी आहे. धर्मांतर, ‘कॉर्पाेरेट जिहाद’, लव्ह जिहाद, बांगलादेशी घुसखोरी, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार यांविषयी ते एक शब्दही काढत नाहीत. ‘ॐ नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या’ ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची पहिली ओवी आहे. वेद हे वारकर्‍यांचे प्रमाण आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही वैदिक परंपरा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ‘हे विश्वचि माझे घर’ या शब्दांत सांगितली आहे. वारकर्‍यांचा ध्वजच भगवा आहे, मग वारकरी हिंदु धर्मापासून वेगळे कसे असतील ? ‘जय श्रीराम’ अन् ‘रामकृष्ण हरि’ वेगळे असू शकत नाहीत. आम्ही ६० टक्के नव्हे, १०० टक्के सनातनी आहोत.

राज्यभर जनआंदोलन उभारणार ! – श्री श्री शिवरूपानंद स्वामी, सहमंत्री, कोकणप्रांत, विश्व हिंदु परिषद

स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी अशी विधाने केली जातात. विकास लवांडे यांनी जी २० नावे घोषित केली, ती वारकरी संप्रदायातील समाजातील रत्ने आहेत. हत्ती चालत असतांना कुत्रे भुंकतात. वारकर्‍यांना धर्मांध ठरवण्याच्या प्रकाराविरोधात आम्ही जनआंदोलन उभारणार आहोत.

संतांचे कार्य अलौकिक ! – ह.भ.प. सुनील रानकर महाराज

या वेळी ह.भ.प. सुनील रानकर महाराज म्हणाले, ‘‘संतांचे कार्य अलौकिक आहे. महाराष्ट्र संतांचा आहे. आम्ही कोणत्या पक्षाचे नाही, तर वारकरी संप्रदायाचे प्रवक्ते आहोत.’’

धर्माच्या विरोधात जाणार्‍यांचा पक्षही टिकणार नाही ! – ह.भ.प. सुभाष महाराज तरणे

ह.भ.प. सुभाष महाराज तरणे म्हणाले, ‘‘वारकर्‍यांना पाठिंबा दिला, तर पंतप्रधान निवडून येतात. वारकर्‍यांनी निर्णय घेतला, तर पक्षही टिकणार नाही. धर्माच्या विरोधात जातील, त्यांचा पक्षही टिकणार नाही.’’