पू. अनंत आठवले यांनी ‘भक्ती’ या उपासना पद्धतीविषयी केलेली उकल !

१४.४.२०२६ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पृष्ठ ७ वर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांचे भाऊ पू. अनंत आठवले यांचे संभाषण प्रसिद्ध झाले आहे. त्यामध्ये पू. अनंत आठवले यांचे ‘भक्तीयोग’ हे तुमचे शास्त्र वेगळे आहे. वेदांमध्ये देवाविषयी काही सांगितलेले नाही. ब्रह्माविषयी सांगितले आहे. सगळे वेद ‘ब्रह्म’ या एकाच विषयावर आधारित आहेत.’ असे लिखाण आहे. याविषयी पू. अनंत आठवले यांनी केलेला खुलासा पुढे दिला आहे.

(भाग २)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/1029548.html

पू. अनंत आठवले

१. ‘भक्ती’ हे शास्त्र नसून एक उपासना पद्धत आहे !

‘पूर्वमीमांसा, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक आणि वेदान्त (उत्तरमीमांसा)’ ही सहा शास्त्रे आहेत. भक्ती ही उपासना पद्धत आहे, ते शास्त्र नाही. भक्ती भावना आणि भावप्रधान आहे. भक्तीनेसुद्धा मुक्ती मिळते आणि ‘ती कशी मिळते ?’, हे माझ्या लेखांमध्ये स्पष्ट केलेले आहे.

२. चित्तशुद्धी झाल्यावर ‘आत्मा हा ब्रह्मच आहे’, याचे आकलन होत असून ‘भक्ती’ हासुद्धा चित्तशुद्धीचा एक मार्ग आहे !

वेदांना ‘शब्दब्रह्म’ म्हणतात. ते शाब्दिक ज्ञान म्हणजे माहिती देतात. वेदांतील शाब्दिक ज्ञानाची अनुभूती आल्यावरच प्रत्यक्ष ज्ञान, म्हणजे बोध होतो. ब्रह्माच्या ‘सत्य, ज्ञान (जाणीवकळा) आणि अनंतत्व’ ह्या स्वरूपाची प्रतीती येते (ब्रह्मज्ञान), त्याचा उपाय केवळ आणि केवळ ‘चित्तशुद्धी’ आहे’, हे उमगते. ती चित्तशुद्धी झाल्यावर आत्मा हा ब्रह्मच असल्याचे आकलन (आत्मज्ञान) होते. अशा चित्तशुद्धीचे अनेक मार्ग आहेत आणि त्यात भक्तीसुद्धा आहे. भगवद्गीतेत ‘‘त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।’’ (अध्याय २, श्लोक ४५) असे भगवान् श्रीकृष्णांनी सांगितले आहे. त्याचा अर्थ आहे, ‘वेद त्रिगुणात्मक आहेत. अर्जुना, तू त्रिगुणातीत हो.’ पण भक्तीमार्गात मुख्यतः सगुण ईश्वराची उपासना असते. गुणातीत ईश्वराविषयी सहसा सांगितलेले नाही.

३. ‘देव आणि उपनिषद्प्रतिपादित ‘ईश्वर’ एवं भक्ती मार्गातील ‘ईश्वर’ यांच्यामध्ये अंतर आहे !

वेदांमध्ये देवांविषयी सांगितलेले आहे. अगदी इंद्रियांनासुद्धा ‘देव’ म्हटलेले आहे. तो वेगळा विषय आहे. ‘ईश्वर’ हा शब्द उपनिषदांमध्येसुद्धा आहे; पण उपनिषद्प्रतिपादित ‘ईश्वर’ आणि भक्ती मार्गातील ईश्वर यांच्यामध्ये खूप अंतर आहे.

ज्यांना ज्ञानाविषयी अनास्था आहे, त्यांनी १४.४.२०२६ च्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील पृष्ठ ४ वरील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींचा लेख कृपया वाचावा.’

– पू. अनंत आठवले (१४.४.२०२६)