संपादकीय : भोंदू पुरोगाम्यांपासून सावधान !

शरद पवार

देहली येथील महिला शासकीय अधिकार्‍यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा ११ एप्रिल या दिवशी पार पडला. या वेळी मंचावरून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘‘वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांच्या लोकांची घुसखोरी झाली आहे. त्यांच्यामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत आहे.’’ कीर्तन-प्रवचन यांतून पुरो(अधो)गामी भूमिका मांडणार्‍यांची सूचीही सिद्ध करत असल्याचे शरद पवार यांनी या वेळी सांगितले. शरद पवार यांना अपेक्षित पुरोगामित्वाची भूमिका मांडणारे काही पुरोगामी त्यांनी स्वत: पोसले आहेत. अर्थात् पोसलेल्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था मालकालाच पहावी लागत असते. त्यामुळे असे पुरोगामी नेहमीच शरद पवार यांच्या आजूबाजूला नेहमीच असतात. संभाजी ब्रिगेड ही त्यातीलच एक संघटना आहे. त्यामुळे संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार यांचे पुरोगामित्व हे सारखेच आहे. वारकर्‍यांमुळे धर्मांधता वाढत असल्याचे वाटू लागल्यावर वारकर्‍यांमध्ये संभाजी ब्रिगेडचे पुरोगामित्व आणण्याचा मानस शरद पवार यांचा दिसून येतो.

चिंता केवळ इस्लामच्या अपकीर्तीची !

वर्ष २०२४ मध्ये नवी मुंबई येथे झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनामध्ये शरद पवार मुख्य अतिथी म्हणून मंचावर असतांना त्यांच्या व्याख्येतील पुरोगामी ज्ञानेश महाराव यांनी ‘रामाने गर्भवती पत्नीला (सीतामाता) लोकांच्या बोलण्यावरून घराबाहेर पाठवले आणि आपण त्याला देव मानतो. आपल्याला लाज वाटली पाहिजे’, असे वक्तव्य केले होते. ‘आराध्य म्हणून हिंदु धर्मीय ज्यांची पूजा करतात आणि जे वारकर्‍यांचेही दैवत आहे, अशा श्रीरामाचे दैवत्व नाकारणे’, असेच पुरोगामित्व शरद पवार यांना अभिप्रेत आहे. तसे नसते, तर असे बोलणार्‍या ज्ञानेश महाराव यांना शरद पवार यांनी हटकले असते; परंतु मंचावर असूनही पवार यांनी ज्ञानेश महाराव यांना त्यांच्या चुकीची जाणीवही करून दिली नाही. वर्ष १९९३ च्या मुंबईच्या साखळी बाँबस्फोट मालिकेमध्ये प्रत्यक्ष ११ बाँबस्फोट हिंदूबहुल भागांत झाले असतांना महंमद अली रोड येथे १२ वा बाँबस्फोट झाल्याची खोटी माहिती शरद पवार यांनी माध्यमांना दिली. इस्लामची मानहानी वाचवण्यासाठी माध्यमांना बिनदिक्कतपणे खोटी माहिती देणारे शरद पवार श्रीरामाविषयी खरी वस्तूस्थितीही सांगायला मात्र पुढे येणार नाहीत, हेही तितकेच खरे. शरद पवार यांनी मंचावरूनच ज्ञानेश महाराव यांना खडे बोल सुनावले असते; परंतु पवारांना इस्लामच्या अपकीर्तीची चिंता वाटते, तसेच त्यांना श्रीरामाच्या अपकीर्तीची चाडही नाही. ‘वारकर्‍यांनी पुरोगामी व्हावे’, असे शरद पवार यांना वाटते, याचा स्पष्ट अर्थ ‘हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर कितीही आघात झाले, तरी तोंडातून ‘ब्र’ही काढायचा नाही. इस्लामची धर्मांधता दिसली, तरी कीर्तनातून मात्र त्यांच्या बंधुभावाचा प्रचार करावा’, असा आहे. अशा या शरद पवारांचे पुरोगामित्व वारकर्‍यांनी वेळीच लक्षात घ्यावे.

उपदेशाचे डोस हिंदूंनाच ! 

जितेंद्र आव्हाड हेही शरद पवार यांच्याच पुरोगामी पिलावळीतील त्यांचेच एक आमदार आहेत. ‘राम मांसाहार करत होता’, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे मोठेपण औरंगजेब याच्यासारख्या शक्तीशाली शत्रूशी लढल्यामुळे अधोरेखित होते’, अशा प्रकारे हिंदूंच्या श्रद्धांवर आघात करणारी वक्तव्ये त्यांनी वेळोवेळी केली आहेत. याविषयी त्यांचा कान शरद पवार यांनी कधीच पकडलेला नाही. ‘लोक माझे सांगाती’ या स्वत:च्या आत्मचरित्रात शरद पवार यांनी आवर्जून सनातन संस्थेची तुलना आतंकवादी संघटनांशी केली आहे. एका आध्यात्मिक आणि प्रखर राष्ट्रप्रेमी संस्थेवर एकही आरोप सिद्ध झालेला नसतांना शरद पवार यांनी तिची तुलना कट्टर आतंकवाद्यांशी करत चिंता व्यक्त केली; पण मुंबईच्या बाँबस्फोटात सहभागी असलेल्या याकूबच्या अंत्ययात्रेला गर्दी करून राष्ट्रघातकी उदात्तीकरण करण्याच्या प्रवृत्तीविषयी त्यांना चिंता वाटत नाही. त्यामुळे आत्मचरित्रात उल्लेख सोडा, त्याविषयी तोंडातून चकार शब्दही त्यांनी कधी काढला नाही. हा आहे शरद पवार यांचा खरा पुरोगामीपणा ! अध्यात्माच्या नावाने लोकांना भ्रमित करणारे जसे अशोक खरात याच्यासारखे भोंदू, तसे पुरोगामित्वाच्या नावाने सोयीची भूमिका घेणारे कोण ? हे वारकर्‍यांनी ठरवावे आणि मग कुणाला निवडून द्यावे, हे वारकर्‍यांसह लोकांनी ठरवावे.

 …हिरवी धर्मांधता दिसत नाही !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव यांनी विठ्ठलाची भक्ती केली, तशी भक्ती करण्याचा उपदेश शरद पवार यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधीही दिला नाही. ‘खरातसारख्या भोंदूकडे जाण्याने नव्हे, तर निर्मळ भक्तीने साक्षात् पांडुरंगाचा अर्थात् भगवंताचा साक्षात्कार होईल’, असे शरद पवार यांनी सांगितले असते, तर एकवेळ त्यांना पुरोगामी म्हणताही आले असते. ज्यांना हिंदुत्वाचे वावडे आहे; ते छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदुत्वाची बाजू पुसण्यासाठी ते कसे पुरोगामी होते, त्यांच्या सैन्यात किती मुसलमान सैन्य होते, त्यांनी कधी मशीद तोडली नाही, असे सांगण्याच्या उचापती करत असतात. छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व, त्यांचे गोरक्षण, अफझलखानाचा कोथळा काढून त्यांनी आतंकवाद कसा संपवला, याविषयी मात्र ही मंडळी कधीच बोलत नाहीत. शरद पवार यांचे वारकरी परंपरेविषयीचे बोलणेही असेच आहे. वारकर्‍यांच्या भक्ती परंपरेविषयी आयुष्यात कधीही गुणगान न करता वारकर्‍यांना धर्मांध ठरवणे, हा त्यांच्यातील हिंदुत्वाविषयीचा द्वेष आहे. शरद पवार यांना खरोखर अध्यात्माविषयी वा वारकर्‍यांविषयी श्रद्धा असती, तर त्यांनी त्यांचे पाळीव पुरोगामी हिंदूंच्या श्रद्धास्थानांची अपकीर्ती करत असतांना रोखले असते. तसे न करता वारकर्‍यांना मात्र तत्त्वज्ञानाचे डोस पाजणे, म्हणजे वारकरी हिंदुत्वाविषयी जागृत होत असतांना उठलेली पोटदुखी होय. ‘वारकरी पदभ्रष्ट झाले आहेत, धर्मांधतेकडे वळत आहेत’, असे शरद पवार यांना वाटत असेल, तर त्यांनी भक्ती परंपराचा प्रसार करावा; परंतु वारीला अंधश्रद्धा ठरवू पहाणार्‍यांना डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या पुरोगामी भोंदूंना जवळ करणार्‍यांवर विश्वास कुणी ठेवावा ? वारकर्‍यांमध्ये वाढत असलेली धर्मांधता शरद पवार यांना दिसते; परंतु ज्या धर्मांधांमुळे भारत मागील अनेक वर्षे जळत आहे,

ती हिरवी धर्मांधता त्यांना दिसत नाही. त्यामुळे अशा भोंदूगिरीपासून वारकरी आणि समस्त हिंदूंनी सावध रहावे इतकेच; कारण भोंदू केवळ अध्यात्मातच आहेत, असे नाही, पुरोगाम्यांमध्ये आणि राजकारण्यांमध्येही शिरले आहेत. त्यामुळे वारकर्‍यांना पुरोगामित्वाची नव्हे, तर पुरोगाम्यांना भक्तीची आवश्यकता आहे !

शरद पवार यांना वारकरी धर्मांध वाटतात; पण त्यांना देशातील हिरवी धर्मांधता दिसत नाही !