पत्रकार राणा अय्यूब यांच्या पोस्ट्स अपमानास्पद आणि सांप्रदायिक !

देहली उच्च न्यायालयाकडून पोलिसांना कारवाईचे निर्देश

पत्रकार राणा अय्यूब

नवी देहली – देहली उच्च न्यायालयने पत्रकार राणा अय्यूब यांनी वर्ष २०१३ ते २०१७ या काळात हिंदूंच्या देवता, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर ‘एक्स’वरून प्रसारित केलेल्या आक्षेपार्ह लिखाणावर तीव्र आक्षेप नोंदवला. न्यायालयाने ‘एक्स’ आस्थापन, केंद्र सरकार आणि दिल्ली पोलीस यांना या लिखाणाच्या विरोधात संयुक्तपणे कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच न्यायालयाने राणा अय्यूब, एक्स, केंद्र सरकार आणि देहली पोलीस यांना नोटीस बजावून उत्तर मागवले आहे. यावर पुढील सुनावणी १० एप्रिल या दिवशी होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वी राणा अय्युब यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

१. न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी म्हटले ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावरील लिखाण अत्यंत अपमानास्पद, चिथावणीखोर आणि धर्मांध स्वरूपाचे आहे.

२. ही सुनावणी अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर होत आहे. त्यांनी यापूर्वी साकेत न्यायालयात राणा अय्यूब यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे खटल्याच्या न्यायालयाने अय्यूब यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते आणि पोलिसांना तपासाचे निर्देश दिले होते. दिल्ली पोलिसांनी नंतर न्यायालयाला कळवले की, संबंधित लिखाण सध्या ‘एक्स’वर उपलब्ध नाही.


काय आहेत वादग्रस्त लिखाणे ?

राणा अय्युब यांच्या वर्ष २०१३ मधील एका लिखाणात म्हटले होते की, रावणाने कधीही सीतेला स्पर्श केला नाही. तो असे करू शकला असता. रामाने कधीही सीतेसाठी ठोस भूमिका घेतली नाही. तो तशी घेऊ शकला असता. असे लिखाण करून त्यांनी एकाअर्थाने रावणाचे उदात्तीकरण करून रामाला हीन दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

वर्ष २०१५ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान करण्यात आले होते. तसेच वर्ष २०१६ मध्ये एका घायाळ मुलाचे छायाचित्र प्रसारित करत भारतीय सैन्यावर टीका करण्यात आली होती.