नाशिक येथे रिक्शाचालकांनी रिक्शातील लिंबू-मिरची आणि काळ्या बाहुल्या हटवल्या !

  • अंनिसच्या ‘बुवाबाजीविरोधी’ परिषदेनंतर घडला प्रकार !

  • अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली ‘अंनिस’चा हिंदूंच्या प्रथांवर आघात !

नाशिक – येथील चांडक सर्कलजवळील रिक्शाचालकांनी त्यांच्या वाहनांतील लिंबू-मिरची आणि काळी बाहुली काढली आहे. शहरातील सिटू भवन येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिसच्या) वतीने आयोजित ‘बुवाबाजीविरोधी’ परिषदेत ‘लिंबू-मिरची तोडा, विवेकाशी नाते जोडा’, अशा घोषणा देण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.

‘लिंबू-मिरची हे केवळ खाण्याचे पदार्थ आहेत, त्यांचा शुभ-अशुभाशी संबंध नाही’, असे रिक्शाचालकांचे म्हणणे होते. या उपक्रमात रिक्शाचालक शरद भामरे, दिलीप देवरे, गणपत सोनवणे यांच्यासह ‘अंनिस’चे कार्यकर्ते उपस्थित होते. (आज रिक्शांना अडकवलेली लिंबू-मिरची काढली, उद्या हेच लोक घरातील देवतांची चित्रेही काढण्यास सांगतील किंवा कुलधर्म-कुलाचार हेही ‘अंधश्रद्धा’ म्हणून सोडून देतील. रिक्शाचालकांची कृती म्हणजे हिंदु धर्मावर झालेले एकप्रकारचे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • लिंबू आणि मिरची यांमध्ये वाईट शक्ती खेचून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे हे साहित्य गाड्या किंवा घराचा दर्शनी भाग यांसमोर बांधले जाते. जोपर्यंत हिंदु हे धर्मातील कृतींमागील ‘विज्ञान’ आणि ‘शास्त्र’ समजून घेत नाहीत, तोपर्यंत अंनिससारख्या लोकांच्या नादी लागून त्यांचे वैचारिक धर्मांतर घडतच राहील !
  • ‘विवेकाशी नाते जोडा’, असे म्हणणार्‍या अंनिसने कधी अन्य धर्मियांच्या अविवेकी प्रथांविरुद्ध परिषदा घेतल्याचे कधी ऐकिवात नाही ! केवळ मवाळ हिंदूनंना लक्ष्य करून त्यांच्या मनातील श्रद्धेचे बीज उपटून टाकणे ही अंनिसची छुपी भूमिका आहे. नाशिकसारख्या कुंभनगरीत रिक्शाचालक नास्तिकवाद्यांच्या प्रभावाला भुलणे दुर्दैवी आहे !