माकपचे नेते महंमद सलीम यांनी मालदा येथे झालेल्या हिंसाचाराचे अश्लाघ्य  समर्थन !

माकपचे नेते महंमद सलीम

कोलकाता (बंगाल ) – मालदा जिल्ह्यात न्यायालयीन अधिकार्‍यांच्या घेराव आणि हिंसाचार या घटनेचे समर्थन करतांना माकपाचे वरिष्ठ नेते महंमद सलीम यांनी म्हटले की, जेव्हा अन्यायच कायदा बनतो, तेव्हा विरोध हाच एकमेव मार्ग उरतो.

१. सलीम यांनी म्हटले की, ही घटना केंद्र आणि राज्य सरकार यांच्या अपयशाचे परिणाम आहे, विशेषतः मतदारसूचीतून नावे वगळण्याच्या वादामुळे लोकांमध्ये मोठा रोष आहे. (‘मतदारसूचीतून नावे का काढली गेली ? त्यामागे काय कारण आहे ?’, हे सलीम का सांगत नाहीत ? ज्यांच्याकडे भारताच्या नागरिकत्वाचे पुरावे नाहीत ते घुसखोर आहेत आणि त्यांना देशातून हाकलेच पाहिजे ! अशांचे समर्थन करणारे देशद्रोहीच आहेत ! – संपादक) जेव्हा मतदानाचे अधिकार बाधित होतात, तेव्हा अशा प्रकारचे आंदोलन स्वाभाविक ठरतात.

२. सलीम यांनी असेही म्हटले की, वादग्रस्त मतदारसूची सुधारणा प्रक्रिया ही गरीब, अल्पसंख्यांक आणि वंचित घटक यांच्या विरोधात चालवलेले अभियान आहे. कोणतेही स्पष्ट कारण न देता अनेकांची नावे वगळण्यात आली, ज्याचा परिणाम समाजातील विविध घटकांवर झाला. (‘खोटे बोला; पण रेटून बोला’ या वृत्तीचे माकपचे नेते सलीम ! – संपादक)

काय घडले होते ?

मालदाच्या मोथाबाडी भागात १ एप्रिलला सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशाने येथे गेलेल्या ७  न्यायालयीन अधिकार्‍यांना बीडीओ कार्यालयात बंधक बनवण्यात आले, तर एका अधिकार्‍याला वाहनात सुमारे ९ घंटे रोखून ठेवण्यात आले. या वेळी आंदोलक जमावाने रस्ता बंद, तोडफोड आणि पोलिसांवर आक्रमण केले. या प्रकरणात आतापर्यंत ३५ पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा केवळ भारतातीलच नव्हे, तर जभरातील इतिहास हिंसाचाराच राहिला आहे. त्यामुळे अशा पक्षाकडून हिंसाचाराचे समर्थनच केले जाणार, यात आश्चर्य काय ? अशा पक्षावर आता भारतात बंदी घालणेच आवश्यक झाले आहे !