प्रति आठवड्याला शरिरात जात आहे ‘क्रेडिट कार्ड’च्या वजनाइतके प्लास्टिक !

कुटुंबाचा विनाश थांबवा ! – डॉ. प्रशांत परांजपे यांचे आवाहन

दापोली – ‘सिंगल युज प्लास्टिक टाळा,’ हे आवाहन आपण आजवर अनेकदा ऐकले असेल; पण आता ही केवळ पर्यावरणाची चिंता राहिली नाही, तर ती आपल्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. प्लास्टिक हे हळू हळू मारणारे विष बनले आहे.  ऑस्ट्रेलियातील न्यू कॅसल विद्यापिठाने केलेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधनातून हे भीतीदायक वास्तव समोर आले आहे. मानवी शरिरात आणि चक्क रक्तामध्येही मायक्रोप्लास्टिकने (सूक्ष्म प्लास्टिक कण) शिरकाव केला आहे. त्यामुळे ‘सिंगल यूज’ (एकदाच वापर करण्याजोग्या) वस्तूंचा वापर त्वरित थांबवणे आवश्यक आहे. प्लास्टिकचे हे भयानक वास्तव ओळखून कुटुंबाचा विनाश थांबवा, असे आवाहन डॉ. प्रशांत परांजपे यांनी केले आहे.

१. या संशोधनानुसार वेगवेगळ्या माध्यमांतून एका सामान्य माणसाच्या शरिरात प्रति आठवड्याला ५ ग्रॅम (एका क्रेडिट कार्डच्या वजनाइतके) प्लास्टिक जाते. प्रति महिना
२१ ग्रॅम, तर वर्षाला २५० ग्रॅम प्लास्टिक मानवी अवयवांमध्ये साठत आहे.

२. पडताळणी केलेल्या ८० टक्क्यांहून अधिक लोकांच्या शरिरात सूक्ष्म प्लास्टिक कण आढळले आहेत.

३. नळाच्या पाण्यापेक्षा बाटलीबंद पाण्यात प्लास्टिक कणांचे प्रमाण १० पटीने अधिक आहे.

४. हे कण केवळ पोटापर्यंत मर्यादित नसून रक्त, फुप्फुसे आणि अगदी गर्भाशयापर्यंत  पोचले आहेत.

५. शरिरात साठणारे हे कण कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांना निमंत्रण देत आहेत.

६. पाच मिलीमीटरपेक्षा लहान असलेले प्लास्टिकचे कण म्हणजे ‘मायक्रोप्लास्टिक’. हे कण केवळ सूक्ष्मदर्शकाखालीच दिसू शकतात.

प्लास्टिक शिरकावाची कारणे

१. एकाच वेळी वापरण्याच्या पिशव्या, स्ट्रॉ आणि डिस्पोसेबल कपचा अतिवापर.

२. प्लास्टिक कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची अयोग्य पद्धत

३. सिंथेटिक कपडे, कॉन्टॅक्ट लेन्स आणि वाहनांच्या ‘टायर’मधून उडणारे सूक्ष्म कण.

४. हवेतील धुळीसोबत मिसळलेले प्लास्टिकचे कण श्वासाद्वारे शरिरात जाणे