सातारा येथे खासदार राहुल गांधी यांचा भाजपकडून निषेध

आंदोलन करताना भाजपचे कार्यकर्ते

सातारा, १६ मार्च (वार्ता.) – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संसद भवनासमोर ‘चाय पे पार्टी’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. खासदारांचे हे वर्तन अत्यंत दायित्वशून्य, खेदजनक आणि आक्षेपार्ह आहे. या विरोधात सातारा शहरातील शिवतीर्थावर आणि कराडमधील ढेबेवाडी फाटा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.

भाजपचे पदाधिकारी म्हणाले की, संसद ही आपल्या देशाची सर्वोच्च लोकशाही संस्था आहे. त्याची प्रतिष्ठा आणि मर्यादा राखणे, हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे उत्तरदायित्व आहे; मात्र संसद भवनाला विरोधकांकडून ‘पिकनिक स्पॉट’ (पर्यटनाचे स्थळ) बनवण्याचा प्रयत्न झाला. देशात घरगुती गॅसची कथित टंचाई असल्याचा भ्रम सर्वत्र पसरवण्याचे प्रयत्न काँग्रेसच्या माध्यमातून केले जात आहेत. नुकतीच सहस्रो मेट्रिक टन इंधन आणि गॅस घेऊन २ जहाजे भारतात आली आहेत. त्यामुळे देशात कुठेही इंधनाचा तुटवडा निर्माण होणार नाही. तसेच गॅसचे वितरण सुरळीत चालू असल्याचे लक्षात येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम राखावा.

या वेळी सातारा नगर परिषदेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे, नियोजन समिती सभापती अशोक शेडगे, नगरसेविका प्राची शहाणे, अर्चना कांबळे, रीना भणगे, मंडल अध्यक्ष वैशाली टंगसाळे, अविनाश खर्शीकर, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, विजय काटवटे, जिल्हा समन्वयक प्रवीण शहाणे आदी मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.