India Condemns Pakistan :  आतंकवादी गटांना लक्ष्य करण्याचा आम्हाला अधिकार ! – पाक

पाकने अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणाचा भारताकडून निषेध

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानने १४ आणि १५ मार्च या दिवशी अफगाणिस्तानावर आक्रमण केले. या आक्रमणावर भारताने टीका केल्यानंतर पाकिस्तान सरकारने ‘या प्रकरणावर भारताची भूमिका अनावश्यक आणि निरर्थक आहे’, असे म्हटले. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतावर ‘आतंकवादाला पाठिंबा देणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांकडे दुर्लक्ष करणे’, असा आरोप केला आहे. या विषयावर भारताचा स्वतःचा भूतकाळही वाईट असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अफगाणिस्तानातील आक्रमणांवर पाकिस्तानची भूमिका

अलीकडील काळात पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या आक्रमणांचा भारताने निषेध केला आहे. भारताच्या या भूमिकेविषयी विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर हुसेन अंद्राबी यांनी उत्तर देत भारताचे वक्तव्य पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगितले. ‘पाकिस्तानने आतंकवादी गटांना लक्ष्य केले असून त्याचा अधिकार पाकिस्तानला आहे’, असे त्यांनी म्हटले.

(म्हणे) ‘भारत निराश झाला आहे’ !

ताहिर अंद्राबी म्हणाले की, अफगाणिस्तानातील आतंकवादी आणि त्यांच्या तळांविरुद्ध पाकिस्तानची आक्रमणे वैध आणि अचूक आहेत. अफगाणिस्तानच्या भूमीवरून कार्यरत आतंकवादी संघटनांना भारत समर्थन देतो. त्यामुळे पाकिस्तानच्या कारवाईमुळे भारताच्या नियंत्रणाखालील जाळे नष्ट होत असल्याने भारत निराश झाला आहे.

सिंधू जल करार आणि काश्मीर या सूत्रांचाही उल्लेख

ताहिर अंद्राबी पुढे म्हणाले की, भारत सिंधू करारातील दायित्व विसरून पाण्याचा वापर दबावाच्या साधनाप्रमाणे करत आहे. भारताचे हे पाऊल केवळ अफगाणिस्तान नव्हे, तर संपूर्ण प्रदेशातील शांततेसाठी धोकादायक आहेत.

भारताची प्रतिक्रिया

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी पाकच्या आक्रमणावर म्हटले होते की, रमझानच्या पवित्र महिन्यात अफगाणिस्तानच्या प्रदेशावर पाकिस्तानने केलेल्या हवाई कारवाईचा भारत तीव्र निषेध करतो.

अफगाणिस्तानचा आरोप

अफगाण सरकारचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, पाकिस्तानने नंगरहार आणि पक्तिका प्रांतांत सामान्य नागरिकांवर बाँबफेक केली. यांत महिला आणि मुले यांच्यांसह अनेक जण ठार झाले. हे अफगाणिस्ताच्या सार्वभौमत्त्वावर आक्रमण आहे.

संपादकीय भूमिका

भारताने पाकमधील आतंकवाद्यांवर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक आणि ऑपरेशन सिंदूर यांद्वारे लक्ष्य केल्यावर पाकने त्याला विरोध का केला ?, याचे उत्तर पाकने दिले पाहिजे !