पत्रकारांनी ‘कृत्रिम बुद्धीमत्ते’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे ! – ब्रिजेश सिंह, प्रधान सचिव तथा महासंचालक, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय

मुंबई मराठी पत्रकार संघात ‘एआय परिषद’ !

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित ‘एआय परिषद २०२६’

मुंबई – पत्रकारितेत कृत्रिम बुद्धीमत्तेचा, म्हणजे ‘एआय’चा वापर झपाट्याने वाढत असला, तरी त्याला वास्तव समजण्याची क्षमता नसते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सत्य शोधण्याचे दायित्व आणि समाजाचा विश्वास संपादन करणे, हे पत्रकारितेचे मूलभूत बळ आहे. त्यामुळे पालटत्या तंत्रज्ञानाच्या काळातही पत्रकारितेची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. पत्रकारांनी ‘एआय’कडे धोका म्हणून न पहाता कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे. यासाठी पत्रकारांना ‘एआय’चे प्रशिक्षण देण्यासाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या पुढाकारातून लवकरच ‘एआय इन जर्नालिझम’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू करण्याचा विचार आहे. असे मत महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित ‘एआय परिषद २०२६’चे उद्घाटन महासंचालक श्री. सिंह यांच्या हस्ते झाले.

ते पुढे म्हणाले,

१. भविष्यातही अनेक कामे स्वयंचलित होणार असली, तरी पत्रकारितेमधून सत्यता मांडण्याचे दायित्व मात्र मानवी बुद्धीवरच अवलंबून रहाणार आहे.

२. भारतीय भाषांचे आकलन ही ‘एआय’ची एक मोठी मर्यादा आहे. एआय तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली असली, तरी त्याला मराठीसह भारतीय भाषांचा संदर्भ पूर्णपणे समजत नाही. त्यामुळे भारतीय भाषांसाठी स्वतंत्र ‘एआय’ विकास आणि ‘डेटा सार्वभौमत्व’ महत्त्वाचे आहे.