त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातील समितीच्या अहवालावर निर्णय घेण्यापूर्वी विचारविनिमय करण्यास वेळ मिळावा !

भाषा सल्लागार समितीची मागणी

पुणे – त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात राज्य सरकारने डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय घेण्यापूर्वी विचारविनिमय करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी ‘भाषा सल्लागार समिती’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. पहिलीपासून तिसरी भाषा शिकवण्याला भाषा सल्लागार समितीचा विरोध का आहे ? हे समजून घेण्यासाठी भेटीचा दिनांक आणि वेळ मिळावा, अशी मागणी ‘भाषा सल्लागार समिती’चे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली.

‘पहिलीपासून हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवणे, हे मराठी भाषेसाठी मारक असून त्याने विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो. तसेच मराठी विद्यार्थ्यांची हिंदी भाषेमध्ये समाधानकारक पारंगतता आहे, त्यामुळे पहिलीपासून हिंदी शिकण्याची आवश्यकता नाही. पालकांचीही तशी मागणी नाही. त्यामुळे जाधव समिती रिहत करावी’, अशी मागणी करणारा ठराव भाषा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. ‘मुख्यमंत्र्यांची भेट ही डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर अंतिम निर्णय घेण्यापूर्वी व्हायला हवी’, असे देशमुख यांनी सांगितले.