‘नेपाळचा वापर कोणत्याही शेजारी देशाविरुद्ध होऊ दिला जाणार नाही !’ – नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली

नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचे विधान

नेपाळचे माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली

काठमांडू (नेपाळ) – भारत आणि चीन या दोन्ही देशांशी प्रामाणिक आणि संतुलित संबंध ठेवण्याची आमची भूमिका आहे. एका शक्तीला दुसर्‍याविरुद्ध उभे केले जाणार नाही. नेपाळचा वापर कोणत्याही शेजारी देशाविरुद्ध होऊ दिला जाणार नाही. पिढ्यान्‌पिढ्या आपण येथेच रहाणार आहोत. शेजारी देशही येथेच रहातील आणि आपणही येथेच राहू, असे वक्तव्य नेपाळचे माजी पंतप्रधान आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाल’चे के.पी. शर्मा ओली यांनी केले. ५ मार्च या दिवशी देशात निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

१. नेपाळमध्ये निवडणुकीपूर्वी ४ वेळा पंतप्रधानपद भूषवलेले ओली यांनी भारत आणि चीन या दोन्ही देशांशी चांगले संबंध ठेवण्याची भूमिका मांडली.

२. मागील वर्षी नेपाळमध्ये झालेल्या युवकांच्या प्रचंड आंदोलनावरून त्यांनी ‘हा नेपाळ अस्थिर करण्याचा प्रयत्न होता’, असा आरोप करत या आंदोलनामागे परकीय शक्तींचा हात असल्याचे सूचित केले. तसेच या आंदोलनावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटकांनी ताबा मिळवला होता, असेही त्यांनी म्हटले.

३. ‘निवडणुकीत परकीय निधी येत आहे का ? आणि बाहेरून दबाव आणला जात आहे का ?’, असे प्रश्न विचारल्यावर त्यांनी अशा चर्चा चालू असल्याचे मान्य केले; परंतु ठोस पुरावा नसल्याचे सांगितले. ‘ठोस पुरावा मिळाल्याविना कोणतेही विधान करणार नाही’, असे त्यांनी स्पष्ट केले.

संपादकीय भूमिका

साम्यवादी पक्षाचे अध्यक्ष असलेले ओली यांच्या कार्यकाळात त्यांनी चीनच्या तालावर नाचून भारतद्वेषी विधाने केली आणि नेपाळी जनतेमध्ये भारतविरोधी विष पेरले. त्यामुळे ओली केवळ स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी अशी विधाने करत आहेत, हे भारतीय जनता जाणून आहे !