कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; खासदार नरेश म्हस्के यांचा संताप

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के

ठाणे, ४ मार्च (वार्ता.) – होळी आणि पालखी यानिमित्ताने कोकणात जाणार्‍या प्रवाशांना यंदा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कोकण रेल्वे मार्गावरील बहुतांश जाणार्‍या आणि येणार्‍या गाड्या ५ ते ७ घंटे विलंबाने धावत असल्याने प्रवासी संतप्त आहेत. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

ठाणे येथील शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे. १ मार्च या दिवशी ‘मुंबई-करमळी तेजस एक्सप्रेस’ सुमारे ७ घंटे विलंबाने धावल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तिकिटात जेवणाचा समावेश असूनही प्रवाशांना भोजन मिळाले नाही, अशी तक्रारही करण्यात आली. वारंवार होणार्‍या विलंबामुळे प्रवाशांची वैयक्तिक आणि व्यावसायिक हानी होत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

संपादकीय भूमिका 

कोकण रेल्वेने वेळापत्रकाच्या संदर्भातील अडचणी दूर करून प्रवाशांना दिलासा द्यावा !