हिंदूंची अतिक्रमणे काढली, इतरांची न काढल्यास मी बुलडोझर आणेन ! – महेश लांडगे, आमदार, भाजप

इराणच्या अध्यक्षाचे सुतक पाळणार्‍यांचे डी.एन्.ए. पडताळा !

(डी.एन्.ए. म्हणजे डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड, म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) 

आमदार महेश लांडगे

पाथर्डी (जिल्हा अहिल्यानगर) – मढी येथील अतिक्रमणे काढतांना प्रशासनाने फक्त हिंदु समाजाचीच अतिक्रमणे काढली आहेत. या ठिकाणी जी इतर अतिक्रमणे आहेत, ती ८ दिवसांत काढून टाकावीत अन्यथा मी स्वतः बुलडोझर घेऊन येईन आणि अतिक्रमणे काढून टाकेन. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या निधनानंतर काहीजण भारतात ओरडत आहेत. भारतात रहायचे आणि सुतक त्यांचे पाळायचे; म्हणून त्यांचे डी.एन्.ए. पडताळले पाहिजेत, असे परखड मत भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मांडले. मढी येथे २ मार्चला आयोजित हिंदु विराट सभेत त्यांनी आक्रमक भाषण करत आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, सरपंच संजय मरकड, सागर बेग, अशोक महाराज पालवे, अमोल गर्जे आदींची उपस्थिती होती.

आमदार लांडगे यांनी मांडलेली अन्य सूत्रे 

१. त्यांच्या प्रार्थनास्थळासमोर हिंदूंना दुकाने लावू दिली जात नाहीत. मग आमच्याही मंदिरासमोर त्यांना आम्ही दुकाने लावू देणार नाही.

२. मढी देवस्थानाच्या जागेवर वक्फ बोर्डाचे नाव कसे आले ? याची महसूल विभागाने सखोल चौकशी करायला हवी. या विषयवार मी विधानसभेत आवाज उठवणार आहे. जे हिंदूंच्या देवस्थानांवर वक्फचा अधिकार सांगतात त्यांच्या मतांची मला आवश्यकता नाही. आमदार नाही झालो तरी चालेल.

हिंदु देवस्थानच्या भूमीवर वक्फ बोर्डाचे नाव लावणार्‍यांची खुमखुमी जिरवावी लागणार ! – आमदार संग्राम जगताप

धर्मजागृतीसाठी आपल्यातील वाद बाजूला ठेवले पाहिजेत. मढीतील इतर अतिक्रमणे पाडण्यासाठी मी आणि लांडगे येणार आहोत. जे कुंकू लावत नाहीत आणि आपला प्रसादही खात नाही त्यांना या ठिकाणी दुकाने लावू दिली जाणार नाहीत. हिंदु देवस्थानच्या भूमीवर वक्फ बोर्डाचे नाव लावणार्‍यांची खुमखुमी जिरवावी लागणार.

पुरो(अधो)गामी विचार संपले, सर्वधर्मसमभाव संपला ! – आमदार महेश लांडगे

मढी देवस्थानाची २ सहस्र एकर भूमी अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. त्यातील ९४ एकरवर वक्फ बोर्ड दावा सांगत आहे. अहिल्यानगर शहरामध्ये जुने जिल्हाधिकारी कार्यालय, जुनी महापालिका यांवर वक्फ बोर्ड दावा सांगत आहे. सरकारपेक्षा वक्फ बोर्डाची जागा अधिक आहे. आता पुरो(अधो)गामी विचार संपलेत, सर्वधर्मसमभावही संपला आहे, असे मी प्रशासनाला सांगतो. माझ्या नावापुढे पैलवान लिहिले जाते. ही कोणती पदवी नाही, पैलवान ही पदवी देव, देश, धर्म यांचे संरक्षण करण्यासाठी दिली आहे.