अजित पवार विमान अपघात प्रकरणी अन्वेषण करून सत्य जनतेसमोर आणावे ! – शशिकांत शिंदे, आमदार, शरद पवार गट

  • प्रशासकीय दिरंगाई आणि तक्रारीविषयी टाळाटाळ यांविषयी संताप व्यक्त !

  • विमान अपघात दुर्घटना कि घातपात

 

प्रतीकात्मक चित्र

मुंबई, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – दिवंगत अजित पवार यांचा विमान अपघात ही दुर्घटना आहे कि घातपात, याचा खुलासा झालेला नाही. या प्रकरणी राजकारण करायचे नाही; मात्र सत्य बाहेर आलेच पाहिजे. अन्यथा बारामतीपासून चालू झालेले आंदोलनाचे लोण राज्यात पसरेल, अशी चेतावणी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.

शशिकांत शिंदे

ते म्हणाले की, या अपघात प्रकरणी गंभीर घटनेची तक्रार प्रविष्ट करणे बंधनकारक आहे; मात्र तरीही गुन्हा का नोंदवला गेला नाही ? राज्याच्या प्रमुखांच्या संदर्भातील घटनेत एवढी अनास्था दुर्दैवी आहे. विमान प्रवासात पालटलेले दोन्ही वैमानिक सध्या कुठे आहेत ? त्यांची चौकशी करण्यात आली का ? ‘ब्लॅक बॉक्स’ सुरक्षित असल्याचे सांगितले जाते, मग त्यातील निष्कर्ष जनतेसमोर का आणले जात नाहीत ? ‘डीजीसीए’ने (नागरी विमान वाहतूक संचालनालयाने) ‘व्ही.एस्.आर्.’ आस्थापनाच्या विमानांवर बंदी घातली; मात्र बंदी घालून दायित्वातून सुटका होत नाही. खासगी आस्थापनातील गुंतवणूकदारांना अनुमती देतांना नियमांचे उल्लंघन झाले का ? या प्रकरणी ‘सीआयडी’ (राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून) चौकशीची मागणी होत असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ‘सीबीआय’ (केंद्रीय अन्वेषण पथकाकडून) चौकशीची मागणी केली आहे.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी सांगितले, ‘‘जनतेच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे शासनाने निवेदन करून वस्तूस्थिती मांडावी.’’