(म्हणे) ‘गांधी कुटुंबाने आर्थिक साहाय्य मागितले, तर १ सहस्र कोटी रुपयेही जमा करू !’ – CM Revanth Redddy

तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत विधान

तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी

भाग्यनगर (तेलंगाणा) – गांधी कुटुंबाला आवश्यकता भासल्यास आर्थिक साहाय्य देण्यासाठी सिद्ध रहावे. जर गांधी कुटुंबाने साहाय्य मागितले, तर मी १ सहस्र कोटी रुपयेही जमा करू शकतो, असे विधान तेलंगाणातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी येथील हरिता व्हॅली रिसॉर्टमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत केले. या विधानावरून भाजप आणि भारत राष्ट्र समिती या पक्षांनी तेलंगाण राज्य काँग्रेस कमिटीला गांधी कुटुंबाचे ‘एटीएम्’ (ऑटोमेटेड टेलर मशीन – स्वयंचलित रोकड वितरण यंत्र) म्हटले.

मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे ! – भाजप

जेव्हा राज्याचा तिजोरीवर ताण आहे, कल्याणकारी योजना प्रलंबित आहेत आणि कर्मचार्‍यांच्या पगाराला उशीर होत आहे, तेव्हा मुख्यमंत्री एका कुटुंबासाठी निधी गोळा करण्याबद्दल कसे काय बोलू शकतात ? मुख्यमंत्र्यांना याविषयी लाज वाटली पाहिजे, असे भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते एन्.व्ही. सुभाष यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

यावर स्पष्टीकरण देतांना उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क यांचे म्हटले की, मुख्यमंत्र्यांचा उद्देश सामूहिक शक्तीबद्दल होता, कोणत्याही बेकायदेशीर वसुलीबद्दल नव्हता. (या स्पष्टीकरणावर शेंबडे पोर तरी विश्वास ठेवणार आहे का ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • काही आठवड्यांपूर्वी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या पंजाबमधील नवजोत कौर यांनी, ‘काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री होण्यासाठी ५०० कोटी रुपये द्यावे लागतात’, असा आरोप केला होता. ‘आता हा आकडा १ सहस्र कोटी रुपये झाला आहे का ?’ असे रेड्डी यांच्या विधानावरून कुणाला प्रश्न पडल्यास चुकीचे ठरू नये !
  • भारतात सर्वपक्षियांच्या सरकारांना अशा प्रकारे पैसे गोळा करून पक्षाला द्यावे लागतात. जो अधिक पैसे जमा करून देतो, त्याला पद दिले जाते अन्यथा हाकलले जाते. अशा पद्धतीने चालणार्‍या राजकारणामुळे देश कधीतरी सर्वंकष उन्नती करू शकतो का ? भ्रष्टाचारमुक्त होऊ शकतो का ?