राजकीय नेत्यांना भाषणापूर्वी विचार सुधारणे आवश्यक ! – Supreme Court

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

नवी देहली – सर्व राजकीय पक्षांना आमचे आवाहन आहे की, तुम्ही घटनात्मक नैतिकता, मूल्ये, परस्पर आदर आणि आत्मसन्मान या तत्त्वांचे पालन करा. तुम्ही वैचारिक तत्त्वांवर आधारित निवडणुका लढवता, हे ठीक आहे; परंतु एकमेकांचा आदर करणेही महत्त्वाचे आहे. नेत्यांनी देशात बंधुत्व वाढवले पाहिजे. द्वेषपूर्ण भाषणे थांबवण्यासाठी आधी विचार सुधारण्याची आवश्यकता आहे; कारण भाषणापूर्वी विचार येतात. तुम्हा लोकांकडून अशा प्रकारच्या वर्तनाची अपेक्षा नाही, असे आवाहन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या संदर्भातील प्रकरणावर सुनावणी करतांना केले.

१. सर्वोच्च न्यायालय ९ लोकांनी प्रविष्ट केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. ही याचिका आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्या अलीकडील भाषणांच्या आणि भाजप आसामने प्रसारित केलेल्या एका व्हिडिओच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आली होती.

२. या व्हिडिओमध्ये एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य केल्याचा आरोप होता. याचिकेत घटनात्मक पदांवर असलेल्या लोकांसाठी चुकीची आणि द्वेषपूर्ण भाषणे रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसारित करण्याची मागणी करण्यात आली होती.

३. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत याचिकेवर आक्षेप घेतला. सरन्यायाधीश म्हणाले की, ही याचिका एका व्यक्तीच्या विरोधात आहे. विशेषतः या वेळी ती मागे घ्या आणि एक नवीन याचिका प्रविष्ट करा ज्यात सर्व राजकीय पक्षांचा उल्लेख असावा.

४. न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्यांनी असा आभास निर्माण करू नये की, ते विशिष्ट पक्ष किंवा व्यक्ती यांच्या विरोधात आहेत. समजा आम्ही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, पण त्यांचे पालन कोण करेल ? आम्ही कितीतरी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यांची कार्यवाही करण्याचे दायित्वही राजकीय पक्षांचेच आहे.