(म्हणे) ‘भारत ‘हिंदु पाकिस्तान’ होण्याच्या मार्गावर !’ – Ramachandra Guha

हिंदुद्वेषी साम्यवादी इतिहासकार रामचंद्र गुहा यांचे विधान

साम्यवादी इतिहासकार रामचंद्र गुहा

नवी देहली – प्रसिद्ध साम्यवादी इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी भारताच्या पालटत्या राजकीय स्वरूपावर चिंता व्यक्त करतांना भारतीय लोकशाहीची तुलना पाकिस्तानच्या धर्मशासित कारभाराशी केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, भारत सध्या अशा वळणावर आहे जिथे तो ‘हिंदु पाकिस्तान’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

गुहा यांनी मुलाखतीत मांडलेली सूत्रे –

१.  ज्याप्रमाणे पाकिस्तानची निर्मिती एका विशिष्ट धर्माच्या (इस्लाम) आधारावर झाली आणि तिथे अल्पसंख्यांकांना दुय्यम स्थान मिळाले, तीच प्रवृत्ती सध्या भारतात दिसून येत आहे.

२. सत्ताधारी पक्षाकडून हिंदुत्वाचा जो अजेंडा (कार्यसूची) राबवला जात आहे, तो भारताच्या मूळ बहुसंस्कृतीवादाला आणि धर्मनिरपेक्षतेला छेद देणारा आहे.

३. लोकशाही संस्था, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे यांच्या स्वायत्ततेवर होत असलेल्या आक्रमणांमुळे भारत हळूहळू पाकिस्तानच्या मार्गावर जात आहे.

‘हिंदु पाकिस्तान’ म्हणजे नक्की काय ?

जेव्हा राजकारण पूर्णपणे एका धर्माभोवती केंद्रित गेले, जेव्हा अल्पसंख्यांकांना शत्रू म्हणून पाहिले गेले, जेव्हा वैज्ञानिक दृष्टीकोनापेक्षा धार्मिक कट्टरतेला महत्त्व दिले गेले, या सर्व गोष्टी पाकिस्तानच्या निर्मितीचे आणि तिथल्या अधोगतीचे मूळ कारण होत्या आणि आता भारतातही हिंदुत्वाला केंद्रबिंदू ठेवून राजकारण केले जात असून तसेच चित्र दिसत असल्याची भीती गुहा यांनी व्यक्त केली.

संपादकीय भूमिका

भारत हिंदु पाकिस्तान होण्याच्या वाटेवर आहे, असे देशातील एकही मुसलमान म्हणत नाही; मात्र गुहा यांच्यासारखे हिंदुद्रोही अशा प्रकारचे विधान करून हिंदूंना आतंकवादी, कट्टरतावादी, धर्मांध दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे !