(म्हणे) ‘हिंदी भाषिकांना इंग्रजी येत नसल्याने ते तमिळनाडूमध्ये पाणीपुरी विकायला येतात !’ – M. R. K. Panneerselvam

तमिळनाडूचे कृषीमंत्री एम्.आर्.के. पन्नीरसेल्वम् यांचे द्वेषपूर्ण विधान

तमिळनाडूचे कृषीमंत्री एम्.आर्.के. पन्नीरसेल्वम्

चेन्नई (तमिळनाडू) – उत्तर भारतातून आलेल्या लोकांना केवळ हिंदी भाषा येते. त्यामुळे त्यांना चांगल्या नोकर्‍या मिळत नाहीत. ते तामिळनाडूत येऊन पटल (टेबल) स्वच्छ करणे, मजुरी करणे किंवा पाणीपुरी विकणे यांसारखी कामे करतात, असे विधान तमिळनाडूचे कृषीमंत्री एम्.आर्.के. पन्नीरसेल्वम् यांनी एका कार्यक्रमात केले. ‘तमिळनाडूच्या द्वि-भाषा धोरणामुळे (तमिळ आणि इंग्रजी) आमची मुले अमेरिका, लंडनसारख्या ठिकाणी जाऊन कोट्यवधी रुपये कमावत आहेत’, असेही ते या वेळी म्हणाले.

विरोधी पक्षांकडून टीका !

भाजपने या विधानावर टीका करतांना म्हटले की, द्रमुकचे (द्रविड मुन्नेत्र कळघम्- द्रविड जनता पक्षाचे) अनेक नेते स्थलांतरित कामगारांची, विशेषतः उत्तर भारतीय किंवा हिंदी बोलणार्‍यांची वारंवार खिल्ली उडवत आले आहेत. तमिळनाडूमध्ये स्थलांतरित कामगारांविरुद्ध हिंसाचार वाढत असतांना अशा प्रकारची विधाने दायित्वशून्य आणि धोकादायक आहेत.

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनीही टीका करतांना म्हटले की, काही नेते त्यांच्या विधानांद्वारे नेहमी चर्चेत राहू इच्छितात. आमचे सरकार पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वावर पुढे जात आहे.

काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम् यांनीही द्रमुकवर टीका केली. ते म्हणाले की,  तमिळनाडूला इतर राज्यांमधून कामगारांची आवश्यकता आहे, जे येथे येऊन राज्याच्या  अर्थव्यवस्थेला गती देऊ शकतील. त्यांचे तमिळनाडूमध्ये स्वागत असून ते राज्यात सुरक्षित आहेत.

संपादकीय भूमिका

देशात भाषेवरून द्वेष पसरवणार्‍या, तसेच सनातन धर्माला नष्ट करू पहाणार्‍या पक्षावर आता देशात सौहार्द राखण्यासाठी बंदीच घालणे आवश्यक आहे !