देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात साधिकेला सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचा लाभलेला सत्संग आणि आश्रमातील चैतन्यामुळे तिला आलेल्या अनुभूती !

कु. साक्षी संतोष रुद्रकंठवार ही मूळची मानवत (परभणी) येथील आहे. सध्या नोकरीनिमित्त ती पुणे येथे वास्तव्यास असते. ती १४ ते १६.११.२०२५ या कालावधीत देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात आली होती. त्या वेळी तिला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कु. साक्षी रुद्रकंठवार

१. आश्रमात सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे दर्शन झाल्यावर भाव जागृत होणे आणि त्यांचे साधनेसाठी मार्गदर्शन मिळाल्यामुळे कृतज्ञता वाटणे

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

‘मी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात १ वर्षानंतर आले होते. आश्रमात आल्यावर मला सगळ्यात आधी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे दर्शन झाले. त्यांना पाहून ‘अंधारात एकाएकी प्रकाश दिसावा’, तसे मला जाणवले. माझा भाव जागृत होत होता. रात्रीच्या महाप्रसादानंतर माझी सद्गुरु राजेंद्रदादांची भेट झाली. तेव्हा त्यांनी ‘‘दैनंदिन जीवनात तू कशी साधना करू शकतेस’, याकडे लक्ष दे’’, असे सांगून मला मार्गदर्शन केले. त्या वेळी भगवंत माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करत असल्यामुळे मला त्याच्याप्रती कृतज्ञता वाटली.

२. आश्रमात नामजप आणि उपाय झाल्यामुळे आतून शांत वाटणे

आश्रमात आल्यावर माझा नामजप आणि उपाय मनापासून होत होते. त्यामुळे मला मनातून शांत वाटत होते. ‘दगदगीच्या जीवनात ही शांतता किती महत्त्वाची असते !’, हे माझ्या लक्षात आले.

३. आश्रमात सेवा करतांना पाय दुखण्याची तीव्रता उणावून नामजपासह सेवा होऊ लागल्याने आनंद जाणवणे

आश्रमात २ दिवस माझ्या सेवेचे नियोजन करण्यात आले होते. सेवेच्या कालावधीत एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ‘माझ्या पायाच्या घोट्याचे शस्त्रकर्म झाल्यामुळे थंडीत माझे पाय नेहमीच दुखायचे; पण आश्रमात या दुखण्याची तीव्रता उणावली होती. त्यामुळे मला पूर्वीएवढा त्रास होत नव्हता.’ त्याचा लाभ म्हणजे मी सेवा करत असतांना माझा नामजप होत होता. त्यामुळे माझ्या मनातील इतर विचारांचे प्रमाण पुष्कळ घटले. माझ्या मनाला शांतता आणि आनंद जाणवत होता. मी सेवा करतांना माझ्याकडून झालेल्या अनेक चुका माझ्या लक्षात आल्या. आता मला त्यावर प्रयत्न करता येतील !

भगवंताच्या कृपेने या अनुभूती आल्याने मी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. साक्षी संतोष रुद्रकंठवार, पुणे (१६.११.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक