गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अद्वितीयत्वाची अल्प कालावधीत प्रचीती घेणारे रायगड येथील सुप्रसिद्ध गायक श्री. रूपेश देशमुख !

२३.८.२०२५ या दिवशी श्री. रूपेश देशमुख यांनी त्यांचा मुलगा चि. ऋतू (वय ४ वर्षे), सहकारी श्री. दिनेश म्हात्रे आणि त्यांची पत्नी सौ. साक्षी म्हात्रे यांच्यासह ठाणे सेवाकेंद्राला भेट दिली. या वेळी सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांच्याकडून त्यांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना कशी करावी ?’, हे समजून घेतले. 

(भाग २)

भाग १  वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/998877.html

श्री. रूपेश देशमुख

 

१. साधनेला प्रारंभ करण्यापूर्वीची श्री. रूपेश देशमुख यांची स्थिती आणि साधनेमुळे त्यांच्यात झालेले पालट

‘श्री. रूपेश देशमुख (बुवा) हे इयत्ता ५ वीपासून त्यांच्या गुरूंकडे गायनाचे शिक्षण घेत आहेत. गायन शिकण्यासाठी ते गुरूंकडे घरातून नियमित २ कि.मी. चालत जात. त्यांनी गायनकला शिकण्यासाठी बालवयात पुष्कळ परिश्रम घेतले. ‘साधनेला प्रारंभ करण्यापूर्वी त्यांची स्थिती आणि साधनेला प्रारंभ केल्यानंतर त्यांना स्वतःमध्ये जाणवलेला पालट’, यांविषयी त्यांनी आम्हाला सांगितलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

१ अ. साधनेला प्रारंभ करण्यापूर्वीची स्थिती

१ अ १. ‘आपण लोकांना ज्ञान देत असल्याने गुरु होण्यास पात्र आहोत’, असे वाटणे : श्री. रूपेश देशमुख यांनी सांगितले, ‘‘मागील १५ वर्षांपासून गायनक्षेत्रात कार्यरत असल्यामुळे आणि समाजात नावलौकिक असल्यामुळे अनेक जण गायन शिकण्यासाठी माझ्याकडे येतात. या कलेमुळे समाजात माझे पुष्कळ कौतुक होते. गायनक्षेत्रातील अनेक लोक मला ‘गुरु’ समजत असल्यामुळे ते मला नमस्कार करून माझे दर्शन घेत असत, तसेच गुरुपौर्णिमेला माझे पूजन करत असत. ‘मी लोकांना ज्ञान देत आहे. त्यामुळे मी ‘गुरु’ होण्याच्या पात्रतेचा आहे’, असे मला वाटायला लागले होते.

१ अ २. अहं वाढल्यामुळे गायनाचा सराव करतांनाही समाधान न मिळणे : प्रसिद्धीमुळे माझा अहं वाढला. मला ‘अंतर्मनात कुठेतरी असमाधान आहे’, याची जाणीव होत होती; परंतु सहकारी मला सांगायचे, ‘‘तुम्ही तुमच्या शिष्यांना ज्ञान देत असल्यामुळे गुरूंप्रमाणेच आहात.’’ त्यामुळे मला स्वतःमधील अहंची जाणीव होत नव्हती. अहं वाढल्यामुळे गायनाचा रियाझ (सराव) करतांनाही मला समाधान मिळत नव्हते. ‘मी कुठेतरी न्यून पडत आहे’, असे मला वाटायचे.

१ आ. साधनेमुळे स्वतःत जाणवलेले पालट

पू. (सौ.) संगीता जाधव

१.    ४ मासांपूर्वी श्री. रोशन खंडागळे यांच्या माध्यमातून मला साधना समजली आणि त्यानुसार मी प्रयत्न चालू केले. त्यानंतर मला स्वतःमधील अहंची जाणीव झाली.

२. अहंमुळे माझे केवळ शिकवणे चालू होते. नवीन शिकणे पूर्णपणे बंद झाले होते. कुलदेवतेचा आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हे नामजप चालू केल्यानंतर मी अंतर्मुख झालो. त्यामुळे ‘मी कुठे चुकत आहे ?’, याची मला आतून जाणीव होऊ लागली.

३. ‘गुरुकृपायोगानुसार साधना चालू केल्याने मला आतूनच आनंद मिळू लागला आणि मला हलके वाटू लागले आहे.’’

२. पू. (सौ.) संगीता जाधव यांना श्री. रूपेश देशमुख यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे !

अ. आमची श्री. रूपेश देशमुख यांच्याशी भेट झाली. तेव्हा त्यांनी स्वतःचा बालपणापासूनचा जीवनप्रवास काहीही आडपडदा न ठेवता मनमोकळेपणाने सांगितला. हे सांगतांनाही त्यांच्यात नम्रता, लीनता आणि सहजता होती.

आ. त्यांनी स्वतःच्या मनातील साधनेविषयीच्या सर्व शंकांचे निरसन करून घेतले. साधनेतील सर्व अडथळे सांगून ‘त्यांवर मात कशी करावी ?’, हे त्यांनी समजून घेतले.

इ. ‘वर्तमानात साधनेविषयी करत असलेले प्रयत्न योग्य आहेत का ?’, याचीही त्यांनी निश्चिती करून घेतली.

ई. ‘साधनेविषयीची सूत्रे समजून घेऊन त्यानुसार जोमाने साधना करीन आणि कोणत्या अडचणी आल्यास त्या त्या वेळी विचारून घेईन’, असेही त्यांनी सांगितले. साधनेविषयीचे मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्याचे महत्त्व त्यांच्या अंतर्मनापर्यंत पोचले आणि शास्त्रानुरूप साधना करण्याची दिशा त्यांना अधिक सुस्पष्ट झाली.

३. ईश्वरप्राप्तीची तळमळ असलेल्या जिवापर्यंत साधना पोचवण्यास श्री गुरु समर्थ असल्याची प्रचीती येणे

एखादी व्यक्ती कुठल्याही स्थितीला असेल आणि त्या जिवाला ईश्वरप्राप्ती करायची तळमळ असेल, तर श्री गुरु त्याच्यापर्यंत कुणाच्याही माध्यमातून साधना पोचवू शकतात. त्यानुसार साधना केल्यास त्या व्यक्तीमध्ये काही दिवसांतच पालट होऊ शकतो. ‘एका जिज्ञासूच्या माध्यमातून साधना सांगून प्रसिद्धीच्या झोतात असणार्‍या कलाकाराच्या जीवनात श्री गुरूंनी आमूलाग्र पालट घडवून आणला’, याचे हे मोठे उदाहरण आहे. ‘ज्यांनी हा ‘गुरुकृपायोग’ निर्माण केला, ती गुरुमाऊली (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले) अवतारी कशी आहे ?’, याची प्रचीती श्री. रूपेश देशमुख यांच्या जीवनातील प्रसंगांतून आली.

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात भगवान श्री विष्णुसम सामर्थ्य असल्याने हे शक्य होऊ शकले’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली. यावरून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांनी निर्माण केलेला ‘गुरुकृपायोग’ यांची अद्वितीयता लक्षात येते.’

(समाप्त)

– (पू.) सौ. संगीता जाधव (सनातनच्या ७४ व्या संत, वय ५६ वर्षे), ठाणे सेवाकेंद्र (सप्टेंबर २०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काहीवेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक