RSS Chief PP Mohan Bhagwat : जोपर्यंत धर्म भारतवर्षाला चालवेल, तोपर्यंत भारतवर्ष विश्वगुरु राहील !

ईश्वरेच्छेचा भाव मनात ठेवल्यास अहंकार दूर होईल !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

मुंबई : आपल्या सर्वांना चालवणारे एकच तत्त्व आहे आणि ते म्हणजे धर्म !  जोपर्यंत धर्म भारतवर्षाला चालवेल, तोपर्यंत भारतवर्ष विश्वगुरु राहील; कारण जगाकडे असा धर्मच नाही. सहस्रो वर्षे अनेक संतांनी हा धर्म जागवला. आता भारतच हा धर्म जगाला देण्याचे काम करील, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. ते घाटकोपर (पूर्व) येथील एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमप्रसंगी आचार्यश्री विजय अक्षयबोधिसूरीश्वरजी महाराज आणि आचार्यश्री विजय महाबोधिसूरीश्वरजी महाराज उपस्थित होते.

प.पू. सरसंघचालक पुढे म्हणाले की,

१. भारतात राजकीय किंवा सामाजिक लोक नव्हे, तर आध्यात्मिक लोकच नेतृत्व करतात. त्यामुळे ज्या वेळी संतांचे प्रवचन चालू असते, त्या वेळी त्यांचे रक्षण करण्याचे कार्य संघ करतो.

२. आपण जे कार्य करत आहोत, त्या कार्याचे वाहक आहोत. हे कार्य ईश्वराचे आहे. त्यामुळे अहंकारातून मुक्त होऊन आपण हे कार्य करत राहिले पाहिजे. अहंकारातून मुक्त होणे अवघड असते; परंतु ‘ईश्वराच्या इच्छेने आपली या कार्यासाठी निवड झाली आहे’, असा भाव मनात ठेवल्यास अहंकार दूर होऊ शकतो.