शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा ! – निमेश नायर

शिळ धरणात पुढील १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठी शिल्लक

शिळ धरणात पुढील १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक

रत्नागिरी – जून महिन्यातील ५ दिवस झाल्यानंतरही अद्याप पाऊस न पडल्याने धरणाची प्रत्यक्ष पहाणी केल्यानंतर ‘१० जूनपर्यंत पाऊस पडला नाही, तर रत्नागिरी शहराला एक दिवस आड पाणीपुरवठा करावा लागेल. सद्य:स्थितीत धरणात उपलब्ध असलेला साठा मर्यादित असल्याने शहरवासियांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करावा, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने सभापती निमेश नायर यांनी केले आहे.

पुढील १५ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठी

शिळ धरणात सध्या ०.५३५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ५३५ एमएलडी (दशलक्ष लिटर) इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. रत्नागिरी शहराच्या दैनंदिन गरजेचा विचार करता, हा साठा साधारण पुढील १५ दिवस पुरेल इतकाच उपलब्ध आहे.

१० जूननंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार 

हवामानातील पालटामुळे मोसमी पावसाच्या आगमनाला विलंब होत आहे. ऐनवेळी पाण्याची पूर्ण टंचाई निर्माण होऊ नये; म्हणून प्रशासनाने १० जून ही दिनांक अंतिम मानली आहे. जर पुढील ५ दिवसांत धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला नाही, तर पाण्याचा उपसा कमी करण्यासाठी आणि उपलब्ध साठा अधिक काळ टिकवण्यासाठी एक आड एक दिवस पाणी देण्याचा निर्णय लागू केला जाईल.