Maharashtra Municipal Election : मतदानाची शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी !

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूक !

मुंबई :  मतदानानंतर बोटाला लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या अनेक तक्रारी राज्यातील विविध भागांतून निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या. मतदानानंतर बोटाला लावण्यासाठी या वेळी ‘मार्कर’चा उपयोग करण्यात आला होता; मात्र या मार्करची शाई त्वरित पुसली गेल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे सचिव साईनाथ दुर्गे यांनीही प्रसिद्धी माध्यमांशी मतदानानंतर बोटाला लावलेली शाई निघून गेली असल्याचे दाखवले.

खोटे करून सत्तेत येण्याला निवडणुका म्हणत नाहीत ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे

सरकारने निवडणुका जिंकायचे ठरवले आहे. जे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी करण्यात आले, तेच आता करण्यता येत आहे; पण आम्ही असे प्रकार होऊ देणार नाही. यापूर्वी मतदानानंतर बोटाला शाई लावली जायची. या निवडणुकीत मार्करने खूण करण्यात येत आहे. ‘सॅनिटाईजर’ने ही खूण पुसली जात आहे. खोटे करून सत्तेत येण्याला निवडणुका म्हणत नाहीत.

…तर ‘ऑईलपेंट’चा वापर करायला हवा ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

निवडणुकीविषयी सर्व गोष्टी निवडणूक आयोग ठरवते. याआधीही मार्करचा वापर झाला आहे. काही शंका असेल, तर निवडणूक आयोगाने दुसर्‍या पेनचा वापर केला पाहिजे. मी तर म्हणतो ‘ऑईलपेंट’चा उपयोग केला पाहिजे; मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थेवर संशय घेणे योग्य नाही.

शाई पुसून पुन्हा मतदान शक्य नाही, संभ्रम पसरवणार्‍यांवर कारवाई करू ! – राज्य निवडणूक आयोग

बोटावर लावण्यात आलेली शाई पुसून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणे, हे अवैध कृत्य आहे. बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास, तिच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिले.

बोटावरची शाई पुसून पुन्हा मतदान करता येत नाही. याविषयीची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याविषयीची नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून पुन्हा मतदान करता येत नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

वर्ष २०११ पासून निवडणुकीसाठी मार्करचा वापर !

मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचा आदेश नोव्हेंबर २०११ मध्ये देण्यात आला आहे. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्करचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदारांच्या बोटावर ठळकपणे उमटेल अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी. नखांवर आणि नखांच्या वरच्या बाजूला त्वचेवर ३-४ वेळा घासून शाई लावण्याची सूचना यापूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.