सिंचन घोटाळ्याचे पुरावे खरे असतील, तर अजित पवार यांना बाहेर काढा ! – उद्धव ठाकरे

मुंबईत सभा !

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ७० सहस्र कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचे पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच आणले होते. आता हे पुरावे पुरावेत कि जाळावेत, हे तुम्हीच ठरवा. हे पुरावे खरे असतील, तर अजित पवार यांना महायुतीमधून बाहेर काढा, असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. ११ जानेवारी या दिवशी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या सार्वजनिक मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले. या वेळी व्यासपिठावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जयंत पाटील यांसह अन्य नेते उपस्थित होते.

या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवली आहे; मात्र भाजपला मुंबई महानगरपालिका अदानींच्या घशात घालायची आहे. आम्ही अस्सल मराठी बोलणारे राष्ट्रप्रेमी हिंदु आहोत. आम्ही भाजपसमवेत हिंदुत्वासाठी युती केली होती; मात्र मुंबई घशात घालण्यासाठी भाजपला हिंदुत्वनिष्ठ शिवसेना नको आहे.’’

मुंबई गुजरातला जोडण्यासाठी प्रयत्न चालू आहेत ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

मराठी माणसाला उद्ध्वस्त केले जात आहे. मुंबईवर आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी मी आणि उद्धव एकत्र आलो आहोत. कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हिंदी सक्तीचा विषय हा केवळ मराठी माणूस जागृत आहे का, हे चाचपडण्यासाठीचा विषय होता. मराठी म्हणून एकत्र येऊ नये, यासाठी प्रयत्न चालू आहेत. मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न चालू आहे. मुंबई मराठी माणसाच्या हातातून गेली, तर येथे झारखंड होईल.