तुळजाभवानीदेवीच्या चरणी अर्पण केलेल्या फुलांपासून सेंद्रिय उदबत्तीची निर्मिती !

रसायनमुक्त उदबत्तीमुळे पर्यावरण संरक्षणाला चालना !

फुलांपासून सिद्ध केलेल्या सेंद्रिय उदबत्तीचे पाकीट

तुळजापूर – ‘श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान’च्या वतीने देवीच्या चरणी अर्पण करण्यात येणार्‍या फुलांपासून सेंद्रिय उदबत्ती सिद्ध करण्याचा पर्यावरणपूरक आणि पवित्र उपक्रम चालू करण्यात आला आहे. वाढत्या भाविक संख्येमुळे साचणार्‍या निर्माल्याचा योग्य वापर व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत अर्पण केलेली फुले गोळा करून ती सेंद्रिय पद्धतीने वाळवली जातात. त्यांची पावडर करून नैसर्गिक घटकांच्या साहाय्याने पूर्णतः रसायनमुक्त उदबत्ती सिद्ध केली जाते. यामुळे निर्माल्याचे पावित्र्य जपले जात असून पर्यावरण संरक्षणालाही चालना मिळत आहे.

फुलांपासून सिद्ध केलेल्या सेंद्रिय अगरबत्तीच्या पाकिटाचे अनावरण करतांना मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी धाराशिव श्री. किर्ती किरण पुजार, महंत आणि पुजारी

श्री तुळजाभवानीदेवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास घटस्थापनेने प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही सेंद्रिय उदबत्ती भाविकांसाठी विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंदिर परिसरातील लाडू विक्री केंद्रावरून उदबत्तीसमवेत धूप, उद आणि हवन कपसुद्धा खरेदी करता येणार आहेत.