Jharkhand  Elephant Attack : झारखंडमध्ये हत्तींच्या कळपाच्या आक्रमणात ५ जणांचा मृत्यू

हत्तींकडून गावातील घरांची तोडफोड

रामगड (झारखंड) – गेल्या २४ घंट्यांत येथील सिरका जंगलातील हत्तींच्या आक्रमणात ५ जणांचा मृत्यू झाला. यात २ महिलांचा समावेश आहे. तसेच हत्तींनी गावात घुसून घरांचीही तोडफोड केली. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभाग आणि जिल्हा प्रशासन यांनी नागरिकांना सतर्क रहाण्याचे आवाहन केले आहे.

हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात २ जलद प्रतिसाद पथके आणि अनेक वनरक्षक तैनात करण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली. ही पथके जंगल तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये सातत्याने गस्त घालत असून पुढील कोणतीही अनिष्ट घटना टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. वन विभागाच्या माहितीनुसार सध्या रामगड आणि बोकारो जिल्ह्यांच्या सीमेलगतच्या जंगलांमध्ये सुमारे ४२ हत्ती वेगवेगळ्या कळपांत फिरत आहेत.

व्हिडिओ काढण्याच्या नादात जीव गेला

विभागीय वन अधिकारी नितीश कुमार यांनी सांगितले की, १६ डिसेंबरला दुपारी अमित कुमार राजवार नावाचा तरुण ८ जंगली हत्तींच्या कळपाजवळ व्हिडिओ आणि छायाचित्रे काढण्यासाठी गेला होता. त्याच वेळी हत्तींच्या कळपाने अचानक आक्रमण केले आणि त्याला चिरडले. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.