Pakistan On Kashmir : (म्हणे) ‘काश्मीर कधीच भारताचा भाग नव्हता आणि कधी होणारही नाही !’

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा थयथयाट !

पाकिस्तानचे समन्वयक गुल कैसर सरवानी

न्यूयॉर्क (अमेरिका)- येथे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या सूत्रावर भारतावर अनेक आधारहीन आरोप केले. याआधी एका दिवसापूर्वी भारतीय प्रतिनिधींनी आतंकवादाच्या विषयावर पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी सुरक्षा परिषदेत ‘काश्मीर कधीच भारताचा भाग नव्हता आणि कधी होणार नाही’ असे विधान केले. ‘शांततेसाठी नेतृत्व’ या विषयावरील खुल्या चर्चेच्या वेळी पाकिस्तानचे समन्वयक गुल कैसर सरवानी यांनी ‘जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त वादग्रस्त प्रदेश असून ही केवळ पाकिस्तानचीच नव्हे, तर संयुक्त राष्ट्रांची अधिकृत भूमिका आहे’, असे सांगितले.

१. सरवानी यांनी सांगितले की, काश्मीर भारताचा तथाकथित भाग नाही, तसेच तो भारताचा कधीच नव्हता आणि कधीच होणार नाही. भारतानेच हा विषय सुरक्षा परिषदेत आणला होता आणि जम्मू-काश्मीरच्या जनतेला संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली जनमत चाचणीद्वारे त्यांचे भवितव्य ठरवण्याची संधी देण्याची दायित्व स्वीकारले होते. जवळपास ८ दशके उलटूनही ते वचन अद्याप पूर्ण झालेले नाही.

२. सरवानी यांच्या मते भारताने या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केले असून मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. स्वतंत्र मत व्यक्त करणार्‍या आवाजांना दडपले जात असून प्रदेशाची भौगोलिक रचना पालटण्याच्या उद्देशाने पावले उचलली जात आहेत. हे आंतरराष्ट्रीय कायदे, तसेच अधिग्रहण करणार्‍या शक्ती म्हणून असलेल्या कायदेशीर दायित्वांचे गंभीर उल्लंघन असल्याचा आरोप त्यांनी केला.

भारत आतंकवादी गटांना पाठिंबा देत असल्याचा आरोप

सरवानी यांनी सुरक्षा परिषदेत आरोप केला की, भारताने ‘तहरीक ए तालिबान पाकिस्तान’, ‘फितना अलख्वारिज’, ‘बलुच लिबरेशन आर्मी’ तसेच ‘फितना हिंदुस्तान’ या आतंकवादी संघटनांना प्रोत्साहन दिल्याचे विश्वासार्ह पुरावे आहेत आणि या गटांनी पाकिस्तानमध्ये आक्रमणे केली आहेत. पाकिस्तानविरुद्ध आतंकवादाला उघडपणे प्रोत्साहन देण्याबरोबरच भारताने वारंवार पाकिस्तानवर आक्रमणे केल्याचा आरोपही त्यांनी केला आणि हे आंतरराष्ट्रीय कायदे आणि संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे गंभीर उल्लंघन असल्याचे सांगितले. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक)

संपादकीय भूमिका

पाकने कितीही थयथायट केला, तरी सत्त कधीच पालटणार नाही आणि काश्मीर कधीही पाकचा भाग होणार नाही. उलट पुढील काही काळात पाकचेच अस्तित्व नष्ट होईल, हे त्याने लक्षात ठेवावे !