महाराष्ट्र शासनाचे ८ वर्षे मुदतीचे १ सहस्र कोटी रुपयांचे रोखे विक्रीस !

मुंबई, १२ डिसेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र शासनाच्या ८ वर्षे मुदतीच्या १ सहस्र कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. रोखे अधिकोषात विकल्यानंतर कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकासकामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे.

अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल; मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या अधिकाअधिक १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल. १६ डिसेंबर या दिवशी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल.