सनातनचे साधक स्वप्नील भोसले यांनी केलेल्या गिरनार यात्रेच्या वेळी त्यांना आलेल्या विविध अनुभूती !

गिरनार पर्वताजवळील दामोदर कुंड

१. ३०.९.२०२५ या दिवशी मी गिरनार यात्रेसाठी मडगाव रेल्वे स्थानकावर गेलो असता तेथे इंदोरचे १०० विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांची भेट झाली. त्या वेळी मला इंदोरनिवासी प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. अनंतानंद साईश यांचे स्मरण झाले. तेव्हा ‘दत्तगुरूंच्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी आरंभापासूनच श्री गुरु माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवले.

२. मी कोकण रेल्वेने प्रवास करत असतांना मला मुंगूस, भारद्वाज, मोर इत्यादी अनेक पशु-पक्षी यांचे दर्शन होऊन मला शुभसंकेत मिळाले आणि त्यांना पाहून मला विविध देवतांचे स्मरण झाले.

३. गिरनारच्या पायथ्याशी श्रीभवनाथ मंदिर आहे. त्याचे दर्शन घेऊन गिरनार यात्रा आरंभ करतात.

४. २.१०.२०२५ मी पहाटे ४.४५ वाजता गिरनार गड चढायला आरंभ केला.

श्री. स्वप्नील भोसले

५. पहाटेची वेळ असल्यामुळे हवेत गारवा होता. मी १५ मिनिटे पुढे गेल्यावर माझे लक्ष सहज आकाशाकडे गेले. तेथे मला सप्तर्षी आणि प्रभु श्रीरामाचा बाण दिसला. त्यांना पाहून मी भावपूर्ण नमस्कार केला.

६. गिरनार गडाच्या ५५०० पायर्‍या चढून श्री अंबाजी मंदिराजवळ पोचल्यावर जोरदार पाऊस चालू झाला. मी तेथे चहा अल्पाहार घेऊन थोडा वेळ विश्रांती घेतली. तेव्हा मला पाहून दुकानदार म्हणाले, ‘‘आज गर्दी अल्प असल्यामुळे तुम्ही गुरुशिखराकडे लवकर पोचाल. तुम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन घेता येईल. ’’

७. वाटेमध्ये दत्तसंप्रदायातील नवनाथांपैकी ‘गोरक्षनाथांचे मंदिर’ आणि ‘अखंड धुनी’ यांचे दर्शन घेऊन मी जलद गतीने गुरुशिखराकडे निघालो. येथे माझ्याजवळ खारूताई आली. तिला मी थोडे माझ्याकडील शेंगदाणे दिले. तिला पाहून मला प्रभु श्रीरामाचे स्मरण झाले. माझ्या मनात ‘जसा प्रभु श्रीरामाने खारूताईचा उद्धार केला, तसा श्री दत्तगुरु माझाही उद्धार करतील’, असा विचार आला.

८. सकाळी ८.४५ वाजता मी ९९९९ पायर्‍या चढून गेल्यावर दत्तगुरु महाराज यांच्या मंदिरात केवळ पुजारी आणि मी असे दोघेच होतो. त्यामुळे मला भावपूर्ण दर्शन घेता येऊन पाच मिनिटे बसून ध्यान करता आले. त्यानंतर मी जवळपास ३० मिनिटे निर्विचार स्थितीत होतो. ‘ही श्री दत्तगुरूंचीच कृपा आहे’, असे जाणवून माझा भाव जागृत झाला.

९. थोड्या वेळानंतर लोक येणे चालू झाले. त्यामुळे मी परतीच्या वाटेला निघालो. मी तेथून ‘कमंडल कुंडा’कडे गेलो. तेथे दत्तमहाराज यांची ‘स्वयंभू धुनी’ असते. तेथेही मी एकटाच असल्याने मला भावपूर्ण दर्शन घेता आले आणि धुनीतील विभूतीही मिळाली.

१०. सकाळी १०.३० वाजता मी श्री अंबाजीमाता मंदिरात पोचलो. तेथेही मी एकटाच होतो. पुजारी म्हणाले, ‘‘येथे गर्दी नाही, असे क्वचितच घडते.’’ त्यांनी मला प्रसाद दिला.

११. दुपारी १२.३० वाजता खाली पोचल्यानंतर मी श्री गुरुचरणी मनोमन कृतज्ञता व्यक्त केली. तेव्हा एका दुकानाच्या बाहेर कुत्र्याची चार पिल्ले खेळतांना दिसली. तसेच गीर गाय आणि वासरूही दिसले. तेव्हा ‘श्री दत्तगुरूंजवळ गाय आणि चार कुत्रे असतात’, याचे मला स्मरण होऊन ‘श्री दत्तगुरु सूक्ष्मातून माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवले.

१२. संध्याकाळी ५ वाजता पुन्हा पाऊस चालू झाला. त्या वेळी पायथ्याकडून मला उंच गिरनार पर्वतावर मोठे इंद्रधनुष्य दिसले. तेव्हा ‘देवाने मला दैवी प्रचीती दिली’, असे वाटले.

१३. जवळ असलेले ‘दामोदरकुंड’ आणि ‘मुचकुंद गुफा’ यांचे बाहेरून दर्शन घेतले. त्या वेळी मला भगवान श्रीकृष्णाचे स्मरण झाले.

१४. मी जुनागड शहरात संत शिरोमणि नरसी मेहता मंदिरात गेलो. तेथे भगवान श्रीकृष्णाने ५२ वेळा साक्षात् दर्शन दिलेले स्थान आहे. तेथे संत नरसी मेहता यांना समुद्रात सापडलेली श्री द्वारकाधीश यांची स्वयंभू पाषाणी मूर्ती आहे. तेथेही मला शांतपणे दर्शन घेता आले.

१५. तेथून १० मिनिटांच्या अंतरावर असलेले ‘शक्करबाग प्राणीसंग्रहालय’ पाहिले. माझ्या भ्रमणभाषमध्ये ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप चालू असल्यामुळे बरेचसे मोर माझ्या अगदी जवळ आले. नाहीतर असे मोर सहसा माणसांच्या फार जवळ येत नाहीत.

१६. त्यानंतर २.१०.२०२५ या दिवशी माझी संपूर्ण गिरनारयात्रा पूर्ण होऊन माझा सुखरूपपणे परतीचा प्रवास चालू केला.

श्री दत्तगुरूंच्या कृपेने कोणताही अडथळा आला नाही. यासाठी मला प.पू. गुरुमाऊलींचे स्मरण होऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’

– गुरुचरणी समर्पित, श्री. स्वप्नील भोसले, ढवळी, फोंडा, गोवा. (१६.१०.२०२५)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक