दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करून श्री गणेशमूर्तींचे तातडीने शास्त्रोक्त विसर्जन करावे ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

हिंदूंच्या श्रद्धेचा अवमान : नवी मुंबईत सहस्रो श्री गणेशमूर्तींचे विसर्जन अजूनही शेष !

अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांना निवेदन देतांना वैद्य उदय धुरी

नवी मुंबई – गणेशोत्सव संपून ३ महिने होत आले, तरी नवी मुंबई महानगरपालिकेने भाविकांकडून गोळा केलेल्या सहस्रो श्रीगणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन केले नसल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या मूर्ती वाहनतळ वा इतर ठिकाणी धूळ खात पडून आहेत. हा हिंदूंच्या धार्मिक भावनांचा घोर अवमान असल्याची भावना गणेशभक्तांमध्ये निर्माण झाली आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट यांनी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन दिले आहे. या प्रकरणी दोषी अधिकारी आणि संबधित उत्तरदायी यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. समितीच्या वतीने वैद्य उदय धुरी यांनी दिलेले हे निवेदन अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी स्वीकारले आहे.

समितीने म्हटले आहे की, अशाच प्रकारे राज्यातील विविध महानगरपालिकांच्या सीमेतही श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्यशासनाने तातडीने हस्तक्षेप करून हिंदूंच्या धर्मभावनांचा विचार करत, संकलित सर्व मूर्तींचे शास्त्रोक्त पुनर्विसर्जन करण्याचा आदेश द्यावा.

नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशीच मुंबई महानगरपालिकेकडून ठाणे जिल्ह्यातील डायघर भागातील ‘डम्पिंग ग्राउंड’वर कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ शेकडो श्री गणेशमूर्ती टाकण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता. त्याविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. यापूर्वीही पुणे, ठाणे, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये खाडी, नाले, खदानी आणि जुन्या विहिरी अशा अयोग्य ठिकाणी मूर्ती टाकल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकारांमुळे गणेशभक्तांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, श्री गणेशमूर्तींचे शास्त्रोक्त विसर्जन न होता त्यांचा अपमान होणे, हे असह्य आहे. प्रशासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे. पुढील काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी विसर्जनानंतर संकलित झालेल्या मूर्तींचे नियोजित पद्धतीने विधीवत् विसर्जन केले जावे. तसेच शासनाने हिंदु संघटना, संत, धर्माचार्य यांच्या सल्ल्याने धर्मसंमत आणि धर्मश्रद्धा जपणारे धोरण ठरवून त्यानुसार कार्यवाही करावी. सध्या ज्या महानगरपालिकांकडे संकलित गणेशमूर्ती आहेत, त्यांचे तातडीने शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात यावे आणि हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान करणार्‍या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.