Sheikh Hasina Slams Muhammad Yunus : भारताशी संबंध तोडणे म्हणजे महंमद युनूस यांचा मूर्खपणा !

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे विधान

डावीकडून माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस

नवी देहली – भारत हा बांगलादेशाचा सर्वांत विश्वासू आणि महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांची भारतविरोधी भूमिका त्यांची निर्बलता आणि अस्थिर कारभार दाखवते. ते धर्मांध गटांच्या पाठबळावर उभे असलेले अनिर्वाचित शासक आहेत. युनूस यांचा भारतावरील द्वेष हा मूर्खपणाचा आणि आत्मघातकी दृष्टीकोन आहे. भारताशी संबंध तोडणे म्हणजे महंमद युनूस यांचा मूर्खपणा आहे. भारत-बांगलादेश यांचे संबंध अतिशय घट्ट आहेत आणि युनूस यांच्या अशा अविचारी वागण्यामुळे ते संबंध ढळणार नाहीत, असे विधान बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केले. भारतामधील एका अज्ञात स्थळावरून दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले.

अंतरिम सरकार जनतेचे प्रतिनिधित्व करत नाही !

भारत-बांगलादेश संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावावर शेख हसीना म्हणाल्या की, ‘सध्याचे अंतरिम सरकार बांगलादेशाच्या जनतेचे, विशेषतः महिलांचे प्रतिनिधित्व करत नाही. भारत आमचा खरा मित्र आहे आणि पुढेही राहील.’ भारताने शरण दिल्याविषयी आणि आदरातिथ्याविषयी त्यांनी भारत सरकारचे आभार मानले.

युनूस यांना पाश्चात्त्य नेत्यांचे समर्थन !

शेख हसीना म्हणाल्या की, महंमद युनूस यांना काही पाश्चिमात्त्य उदारमतवादी नेत्यांचा गुप्त पाठिंबा होता. त्यांनी चुकीचा अंदाज लावला की, युनूस हे त्यांच्यातीलच आहेत; पण आता ते कट्टरतावाद्यांना मंत्री बनवतांना, अल्पसंख्यांकांवर अन्याय करतांना आणि राज्यघटनेचा विध्वंस करतांना पहात आहे, त्यामुळे युनूस यांचा पाठिंबा मागे घेतील, अशी मला आशा आहे.

लोकशाहीची पुनर्स्थापना झाल्यावरच बांगलादेशात परतेन !

शेख हसीना म्हणाल्या की, ‘मी बांगलादेशात परतण्याची एकच अट आहे आणि ती म्हणजे देशात सहभागी लोकशाहीची पुनर्स्थापना व्हावी. अवामी लीगवरील बंदी हटवावी आणि निवडणुका स्वतंत्र, न्याय्य आणि सर्वसमावेशक पद्धतीने घ्याव्यात.’ आगामी निवडणुकांच्या बहिष्काराच्या संदर्भातील बातम्यांवरून शेख हसीना यांनी म्हटले की, अवामी लीगला राजकीय प्रक्रियेपासून दूर ठेवणे चुकीचे आहे. आम्ही सत्तेत असू वा विरोधात, अवामी लीग बांगलादेशाच्या राजकारणाचा भाग राहील.

हिंसक आंदोलनावर नियंत्रण न मिळवणे ही चूक मान्य !

जेव्हा शेख हसीना यांनी मान्य केले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या वेळेची  परिस्थिती आम्ही हाताळू शकलो नाही आणि याचा आम्हाला खेद आहे. या घटनेतून शिकण्यासारखे बरेच आहे; मात्र जनतेला भडकवणार्‍या तथाकथित विद्यार्थी नेत्यांनाही त्याचे दायित्व घ्यावे लागेल.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालवावा !

महंमद युनूस यांनी माझ्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात खटला प्रविष्ट (दाखल) करावा. ते कधीच तसे करणार नाहीत; कारण न्यायालय मला निर्दोष ठरवेल, हे त्यांना ठाऊक आहे, असेही शेख हसीना यांनी सांगितले. त्यांनी बांगलादेशमधील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाची निष्पक्षता नाकारत त्याला ‘कांगारू न्यायालय’ (राज्यघटनाविरोधी न्यायालय) असे संबोधले आणि ते विरोधकांच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप केला.

बांगलादेशाने अप्रसन्नता व्यक्त करत भारताच्या उपउच्चायुक्तांकडे केली विचारणा !

शेख हसीना यांनी मुलाखतीत महंमद युनूस यांच्यावर टीका केल्यानंतर काही घंट्यांतच बांगलादेशातील राजधानी ढाका येथील भारतीय उपउच्चायुक्त पवन बढे यांना अंतरिम सरकारने परराष्ट्र मंत्रालयात बोलावून अप्रसन्नता व्यक्त करत याविषयी विचारणा केली.