Jaipur Dialogues SHATRUBODH : तीन दिवसांत ४२ सत्र – ‘शत्रूबोध’ आणि ‘आत्मबोध’ विषयांवर मंथन !

‘जयपूर डायलॉग्ज २०२५’चा समारोप

एका सत्राच्या वेळी उपस्थितांना संबोधित करतांना डावीकडून शहजाद पूनावाला, अभिजीत अय्यर मित्रा आणि तहसीन पूनावाला

जयपूर (राजस्थान) – राष्ट्रवादी वातावरणात झालेल्या ‘जयपूर डायलॉग्ज २०२५’ या ३ दिवसांच्या परिसंवादाचा समारोप ९ नोव्हेंबरला झाला. ‘शत्रूबोध’ आणि ‘आत्मबोध’ या केंद्रीभूत विषयांवर तीन दिवसांत झालेल्या एकूण ४२ सत्रांमध्ये विचारवंत, राजकारणी, संरक्षणतज्ञ आणि हिंदुत्वनिष्ठ नेते यांनी देशातील चिंतनीय सूत्रे, सांस्कृतिक आणि सुरक्षितता यांच्याशी संबंधित धोरणे यांवर सखोल चर्चा केली. सत्रांमध्ये धर्मांतर, भ्रष्टाचार, शिक्षणव्यवस्था, संरक्षणनिर्भरता आणि संकल्पनात्मक राजकारण यांचे अनेक पैलू समोर आले.

संस्कृतीच्या विरोधातील शत्रूबोध – इतिहासाचा खरा लेखाजोखा केला जावा !

‘सिव्हिलायझेशन शत्रूबोध’ (संस्कृतीच्या विरोधातील शत्रूबोध) या सत्रात डॉ. ओमेंद्र रत्नू, शेफाली वैद्य, एस्थर धनराज, संदीप बालकृष्ण आणि कार्तिक गौर यांनी ऐतिहासिक खोट्या कथानकाच्या विरोधात आग्रही भूमिका घेतली. त्यांनी म्हटले की, इतिहासाच्या विकृतीकरणामुळे हिंदु समाजाची अतोनात हानी झाली. त्यामुळे सांस्कृतिक अभिमान टिकवण्यावर भर देणे आवश्यक आहे, तसेच हिंदूंचा इतिहास पुन्हा लिहिणे काळाची आवश्यकता आहे.

कार्यक्रमाला उपस्थित तज्ञ आणि हिंदुत्वनिष्ठ

राजकीय शत्रू आणि राष्ट्रभेदक धोरणे

देशाचे विभाजन करू पहाणार्‍या राजकारण्यांवरील टीका या सत्रात तुहीन सिन्हा, पल्लवी घोष, अभिजीत अय्यर मित्रा, शहजाद पूनावाला, बाबा रामदास, बी.डी. मुंदडा आणि पत्रकार अभिषेक तिवारी यांनी इतिहासाचे संदर्भ देऊन सनातन धर्माच्या विरोधकांनी आणि मागील काँग्रेस सरकारने अन् गांधी कुटुंबाने केलेला जातीवाद, भेदभाव आणि असमानता यांची सूत्रे उपस्थित केली अन विरोधकांना उघडे पाडले.

शत्रूनाश : शत्रूची ओळख करून घ्यावी आणि धोरण ठरवावे, असा आग्रह

चौथ्या सत्रात आर्. जगन्नाथ, भाऊ तोरसेकर, अवनीश पी.एन्. शर्मा, तहसीन पूनावाला, ‘ जयपूर डायलॉग्ज’चे अध्यक्ष संजय दीक्षित आणि अनुपम मिश्रा यांनी शत्रूची ओळख करून घेतल्यानंतर त्यांच्या विरोधात निर्णायक, कायदेशीर आणि रणनीतिक उत्तर देण्यावर भर दिला. सत्रात असेही सांगितले गेले की, शत्रूची संपूर्णतः ओळखून त्याविरुद्ध समन्वित धोरण आखणे आवश्यक आहे. या सत्रात ‘डिजिटल अखंड भारत’ या उपक्रमाच्या अंतर्गत ‘वर्ल्ड फास्ट एआय फॉर सनातन’ या सनातन धर्माची माहिती देणार्‍या ‘ॲप’चे लोकार्पण करण्यात आले.

आत्मनिर्भर संरक्षण : तंत्रज्ञानावर आधारित पालट अनिवार्य

‘आत्मनिर्भर डिफेन्स (संरक्षण)’ सत्रात लेफ्टनंट जनरल डी.पी. पांडेय, कर्नल मयंक चौबे, कर्नल अजय रैना आणि मेजर जनरल सुधाकर जी. (सर्व सेवानिवृत्त सैन्याधिकारी) यांनी युद्धकलेतील पालट अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर यांवर भर दिला. त्यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये गोळीबाराच्या ऐवजी तंत्रज्ञानाचा निर्णायक वापर करण्यात आला आणि नौदलाच्या ‘मेक इन इंडिया’ नौकेच्या वापराची भूमिका महत्त्वाची ठरली. प्रशासकीय यंत्रणेने आता माजी सैन्याधिकार्‍यांच्या मागण्यांना गांभीर्याने समजून योग्य दिशा घेतली पाहिजे, असा संदेश या सत्रातून देण्यात आला.

शिक्षण विभाग : परदेशी शिक्षणावर परत विचार आवश्यक

‘इंडियन्स कमिंग बॅक टू भारत ?’ (भारतियांनी पुन्हा भारताकडे परतणे) या चर्चेत संक्रांत सानू, सी.के. राजू, राज वेदम आणि विजय सरदाना यांनी सांगितले की, आपली शिक्षणव्यवस्था मोगल आणि नंतर ब्रिटिशांच्या काळात कोसळली; परंतु स्वातंत्र्यानंतरच्या ८ दशकांतही आपण ती पुनर्संचयित करू शकलो नाही. आपली गुरुकुल व्यवस्था संपली आहे. आपला इतिहास केवळ कमकुवत झाला नाही, तर विकृतही झाला आहे. परिणामी, भारतातील शैक्षणिक प्रतिभा परदेशात समृद्ध करण्यासाठी स्थलांतरित होत आहे. चीन प्रत्येक क्षेत्रातील आपल्या (भारताच्या) सर्वोत्तम प्रतिभांची ओळख करून घेतो आणि त्यांना वेगळे प्रशिक्षण देतो, त्यांना ‘सुपर स्पेशलिस्ट’ (अत्यंत प्रतिभावान) बनवतो. जोपर्यंत अन्य देश भारताला जागतिक नेता म्हणून ओळखत नाहीत, तोपर्यंत भारताला काम करण्याची आवश्यकता आहे.

समारोपात्मक संदेश  : ‘हिंदू इकोसिस्टम’ (हिंदू यंत्रणा) काळाची आवश्यकता !

चिंता व्यक्त करतांना वक्त्यांनी सांगितले की, आपण आपल्या आजूबाजूला रहाणार्‍या कुटुंबांची काळजी घेतली पाहिजे. आपण त्यांच्या आवश्यकता आणि समस्या ओळखल्या पाहिजेत अन् त्यांना सरकारी योजनांचे लाभ करून दिले पाहिजेत. या सत्रात अमी गणत्रा, बाबा रामदास आणि संजय दीक्षित म्हणाले की, मुलांमध्ये शत्रूबोधाची भावना निर्माण झाली पाहिजे. सामुदायिक बैठकांमध्ये महिला आणि मुले यांची संख्या वाढवली पाहिजे. सामाजिक माध्यमे आणि ‘पॉडकास्ट’ (ऑनलाइन माध्यमातून मुलाखती प्रसारित करणे) यांमुळे जागरूकता आली आहे; परंतु ही जागरूकता १०० टक्क्यांपर्यंत आणली पाहिजे. सरकारवर अवलंबून रहाण्याऐवजी आपण स्वसंरक्षण केले पाहिजे. आपण संरक्षणाची इकोसिस्टम (यंत्रणा) निर्माण केली पाहिजे.