‘वन्दे मातरम्’ हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रेरणा मंत्र ! – हिंदु जनजागृती समिती, चिपळूण

‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मानवंदना !

चिपळूण येथील क्रांतीगाथा प्रदर्शन आणि हिंदुत्वनिष्ठ

चिपळूण, ८ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘वन्दे मातरम्’विना भारतीय स्वातंत्र्यलढा हा अपूर्णच म्हणावा लागेल. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा तो प्रेरणा मंत्र होता. ‘वन्दे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत आजही म्हणजे ते रचल्यानंतर १५० वर्षांनींही राष्ट्राभिमान्यांमध्ये जाज्वल्य राष्ट्रभक्ती, भारतभूमीविषयी असामान्य प्रेम निर्माण करण्यात सिंहाची भूमिका निभावते. त्यामुळे ‘वन्दे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला मानवंदना देण्यासाठी आणि ते रचणार्‍या बंकीमचंद्र चट्टोपाध्याय यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ८ नोव्हेंबर या दिवशी येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणात सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘क्रांतीगाथा प्रदर्शन आणि संपूर्ण वन्दे मातरम्’ गायन करण्यात आले.

या वेळी उपस्थितांनी भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पे अर्पण केली. त्यानंतर ‘वन्दे मातरम्’ निर्मिती आणि त्यामुळे संपूर्ण भारतात स्वातंत्र्याच्या चळवळीला मिळालेल्या उदंड प्रतिसाद विषयीचा इतिहास याप्रसंगी उपस्थितांना सांगण्यात आला. या कार्यक्रमात विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप, शिवसेना, सनातन संस्था, गोरक्षक, हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

पाचल येथे संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन !

‘वन्दे मातरम्’चा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव !

पाचल येथे ‘वन्दे मातरम्’ गायन करणारे धर्मप्रेमी

येथील श्री महागणपति मंदिर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे चालू असलेल्या धर्मशिक्षण वर्गातील धर्मप्रेमींनी वर्षभरातील जागराच्या पहिल्याच म्हणजे ७ नोव्हेंबर २०२५ या दिवशी संपूर्ण ‘वन्दे मातरम्’चे गायन केले.

या गायनापूर्वी समितीचे श्री. श्रीकृष्ण नारकर यांनी ‘७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या वर्षभरात देशात, तसेच महाराष्ट्रात कोणकोणते उपक्रम राबवून ‘वन्दे मातरम्’चा जागर केला जाणार आहे’, याविषयी थोडक्यात माहिती सांगून ‘वन्दे मातरम्’च्या ऐतिहासिक वाटचालीविषयी अवगत केले. त्यानंतर सनातन संस्थेने सिद्ध केलेली संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ची ‘ऑडिओ क्लिप’ लावून त्यासमवेत धर्मप्रेमींनी ‘संपूर्ण वन्दे मातरम्’  गायन केले. शेवटी धर्मप्रेमींनी उत्स्फूर्तपणे राष्ट्राभिमान जागृत करणार्‍या घोषणा दिल्या.