Mumbai SUNBURN : अमली पदार्थांचे उदात्तीकरण महाराष्ट्रात नको ! – नशाविरोधी संघर्ष अभियान

मुंबईत होणार्‍या ‘सनबर्न’ महोत्सवाच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार !  

मुंबईच्या जिल्हाधिकारी आचल सूद गोयल यांना ‘नशाविरोधी अभियाना’च्या अंतर्गत निवेदन देतांना कार्यकर्ते

मुंबई – अमली पदार्थांची विक्री आणि सेवन यांमुळे गोवा येथे अपकीर्त झालेला ‘सनबर्न’ महोत्सव डिसेंबर मासात मुंबईत होणार आहे. गोवा येथील सनबर्न महोत्सवात एका युवतीचा मृत्यू झाला, तसेच अमली पदार्थांच्या वितरकाला मालासह अटक झाली. असे गंभीर प्रकार घडूनही मुंबईमध्ये सनबर्न महोत्सवाला अनुमती देण्यात आली आहे. अमली पदार्थांचा अड्डा ठरलेल्या या महोत्सवाला अनुमती नाकारावी, अशी मागणी ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’ने मुंबईच्या जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी आचल सूद गोयल यांना ३ नोव्हेंबर या दिवशी निवेदन देण्यात आले.

या वेळी मिठीबाई महाविद्यालयाचे प्राध्यापक श्रीपाद सामंत, वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. लक्ष्मण जठार, सर्वश्री प्रभाकर भोसले, विनायक शिंदे, सुभाष अहिर, विलास निकम, सागर चोपदार, सतीश सोनार, सौ. धनश्री केळशीकर आदी उपस्थित होते. मुंबईचे पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त अभिमन्यू देशमुख, ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’चे संपदा प्रबंधक (इस्टेट मॅनेजर) शिरसाट यांचीही नशाविरोधी संघर्ष अभियानाद्वारे भेट घेण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना याविषयीचे निवेदनही नशाविरोधी संघर्ष अभियानाद्वारे देण्यात आले.

…यासाठी सनबर्न नको !

१. वर्ष २००९ मध्ये गोवा येथील कांदोळी बीचवर झालेल्या ‘सनबर्न’ महोत्सवामध्ये नेहा बहुगुणा या २३ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला होता.

२. वर्ष २०१३ मध्ये गोवा येथील वागातोर बीचवर आयोजित ‘सनबर्न’ महोत्सवामध्ये अमली पदार्थविरोधी पथकाने घातलेल्या धाडीमध्ये सौरभ अगरवाल नावाच्या अमली पदार्थ वितरकाला मालासह पकडण्यात आले. या वेळी शेकडो जण सार्वजनिकरित्या हुक्का आणि चिलीम ओढत असल्याचे आढळले.

३. मुंबईतील ‘फॅशन डिझायनर’ ईशा मंत्री या युवतीचा वर्ष २०१४ मध्ये सनबर्न महोत्सवात मृत्यू झाला होता. अमली पदार्थांच्या अतीसेवनामुळे तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.

४. सनबर्न महोत्सवाच्या आयोजनात अमली पदार्थांच्या विक्रेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी लोकही असतात. हे विदेशी लोक विदेशी पारपत्र घेऊन भारतात येतात आणि येथे अनधिकृतपणे व्यवसाय करतात. त्यांच्यावर काही कारवाई होत नाही.

कायमस्वरूपी बंदीची मागणी !

सनबर्न महोत्सव महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आणि अस्मिता यांना गालबोट लावणारा आहे. त्यामुळे व्यसनाधीनता वाढवणार्‍या अशा महोत्सवांवर कायमस्वरूपी बंदी घालावी. पोलीस आणि अमली पदार्थविरोधी पथक यांनी अशा आयोजकांवर सतत लक्ष ठेवावे. युवा पिढीला अमली पदार्थांच्या गर्तेत ढकलणारा आणि पाश्चात्त्य विकृतींचे उदात्तीकरण करणारा हा महोत्सव महाराष्ट्राच्या भूमीत कधीही होऊ नये, अशी मागणी ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’कडून करण्यात आली.

संपादकीय भूमिका

  • पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून तरुण पिढीला दिशाहीन बनवणार्‍या ‘सनबर्न’ विरोधात निवेदन देण्याची वेळ का येते ? प्रशासनाला तरुण पिढीचे हित लक्षात येत नाही का ?
  • राष्ट्रहानीविरोधात कृतीशील होणार्‍या ‘नशाविरोधी संघर्ष अभियाना’च्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन !