हिंदूंना आपल्याच घातकी हिंदूंपासून अधिक धोका ! – टी. राजासिंह, आमदार

मंगरुळनाथ येथे विराट हिंदु धर्मसभा

अकोला – आपल्याला आपल्याच घातकी हिंदूंपासून अधिक धोका आहे. अशा अविचारी हिंदूंपासून सनातनी विचारसरणीतील लोकांना पूर्णपणे सावध रहाण्याची आवश्यकता आहे. देशाला बाहेरील शत्रूंपेक्षा आतील घातकी जयचंदांपासून अधिक धोका आहे. देशात लव्ह जिहाद होत आहे. हिंदुविरोधी लोक गैरहिंदूंना भडकवत आहेत.

निधर्मीवाद्यांनी हिंदु धर्माविषयी अपसमज पसरवण्याचा उच्छाद मांडला आहे. त्याला लगाम घालणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी जर नसते, तर आज देश कुठल्या कुठे गेला असता, असे प्रतिपादन भाग्यनगर येथील गोशामहलचे आमदार टी. राजासिंह यांनी मंगरुळनाथ येथील विराट हिंदु धर्मसभेत केले. १ नोव्हेंबर या दिवशी जिल्हा परिषद क्रीडा मैदान येथे या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नागा संन्यासी सुदर्शन गिरी (गोस्वामी संत तुलसीदास महाराजांचे वंशज); श्री श्री शिव व्यंकटेश आनंद भारती स्वामी महाराज, हरिद्वार यांची वंदनीय उपस्थिती होती. त्यांनीही सभेला संबोधित केले.

या वेळी ते म्हणाले की, गैरहिंदूंची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून सनातनी हिंदूंची संख्या मात्र दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे देशात ‘हम दो हमारे दो’ (आम्ही दोघे आणि आमचे दोघे – २ मुले) हा कायदा सर्वांसाठी आणणे आवश्यक आहे.

टी. राजासिंह यांना वाशिम जिल्ह्यामध्ये येण्यास प्रतिबंध असूनही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने विराट हिंदु धर्मसभेसाठी त्यांना सशर्त अनुमती दिली होती. हा कार्यक्रम होऊ नये, यासाठी काही हिंदुविरोधकांनी पुष्कळ प्रयत्न केले होते.