Pakistan-Afghanistan Clash Price : पाकिस्तानात टोमॅटो ६०० रुपये, तर आले ७५० रुपये किलो !

अफगाणिस्तानसह झालेल्या युद्धामुळे महागाईने गाठले टोक !

(एआयनिर्मित चित्र)

इस्लामाबाद – काही दिवसांपूर्वी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सीमेवर संघर्ष झाला. याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे. या दोन्ही देशांमधील सीमा बंद झाली आहे, त्यामुळे पाकिस्तानात महागाईचा वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. टोमॅटोची किंमत ५ पटीने वाढली असून तो ६०० रुपये किलो आणि आले ७५० रुपये किलो दराने विकले जात आहे.

१. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात ११ ऑक्टोबरपासून चालू असलेल्या संघर्षामुळे दोन्ही देशांमधील २ सहस्र ६०० किलोमीटर सीमेवरील सर्व दारे बंद असून  व्यापार थांबला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये फळे, भाज्या, खनिजे, औषधे, गहू, तांदूळ, साखर, मांस आणि दुग्धजन्य पदार्थ यांचा व्यापार होतो.

२. काबुलमधील ‘पाकिस्तान-अफगाणिस्तान चेंबर ऑफ कॉमर्स’चे प्रमुख खान जान अलोकझाई यांनी सांगितले की, व्यापार थांबल्यामुळे दोन्ही देशांना प्रतिदिन अनुमाने १० लाख डॉलर्सचे, म्हणजे ८ कोटी ८० लाख रुपयांची हानी झाली आहे. याआधी प्रतिदिन ५०० ट्रक भाज्यांची निर्यात केली जात होती, ती थांबली आहे. सध्या दोन्ही बाजूंच्या सीमांवर ५ सहस्र ट्रक इतका माल अडकला आहे. परिणामी टोमॅटो, सफरचंद आणि द्राक्षे या फळांचे भाव गगनाला भिडले आहेत.

३. रावळपिंडी येथील लहान भाजी विक्रेत्यांनी टोमॅटो, वाटाणे, आले आणि लसूण विकणे बंद केले आहे. लसूण प्रति किलो ४०० रुपये, तर कांदे १२० रुपये किलो या दराने विकले जात आहेत.