Kerala Guruvayur Temple : केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिराच्या सोन्या-चांदीच्या वस्तूंमध्ये घोटाळा ! – लेखापरीक्षण अहवालातून झाले उघड

गुरुवायूर मंदिर

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्याच्या लेखापरीक्षण विभागाने वर्ष २०१९-२० आणि वर्ष २०२०-२१ च्या अहवालात म्हटले आहे की, गुरुवायूर मंदिरातील सोने, चांदी आणि अन्य मौल्यवान वस्तूंच्या व्यवस्थापनात गंभीर अनियमितता अन् अयोग्य प्रक्रिया आढळून आल्या आहेत.

विधींसाठी वापरलेल्या वस्तू परत केल्यानंतर अल्प वजनाच्या निघाल्या !

या अहवालात म्हटले आहे की, मंदिरात दैनंदिन विधींमध्ये वापरल्या जाणार्‍या सोन्या-चांदीच्या भांड्यांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झाला होता. या नोंदी ठेवणार्‍या दुहेरी-कुलूप असलेल्या नोंदवहीची पडताळणी केली असता असे दिसून आले की, वापरानंतर मंदिर व्यवस्थापक, गुरुवायूर देवस्वम् यांना परत केलेल्या वस्तू बहुतेकदा कमी वजनाच्या होत्या. कधीकधी सोन्याच्या वस्तूंऐवजी चांदीच्या वस्तू परत केल्या जात असत. सोन्याच्या मुकुटाऐवजी चांदीचा मुकूट परत करण्यात आला. १० महिन्यांत एका चांदीच्या भांड्याचे वजन १ किलो १९ ग्रॅमने अल्प झाले. एका चांदीच्या दिव्याचे वजन अनेक ग्रॅम न्यून झाले. २ किलो ६५ ग्रॅम चांदीचे भांडे केवळ ७५० ग्रॅम वजनाचे झाले.

५३० किलोपेक्षा अधिक वजनाचे हस्तिदंत गायब

गुरुवायूर देवस्वम्च्या पुन्नाथूर कोट्टा अभयारण्यात हस्तिदंतांच्या देखभालीमध्ये सर्वांत मोठी चूक झाली. पुन्नाथूर कोट्टा येथून गोळा केलेले ५३० किलोपेक्षा अधिक वजनाचे हस्तिदंत गायब होते. वर्ष २०१९-२० च्या लेखापरीक्षणामध्ये असे दिसून आले आहे की, त्या वर्षी मंदिरातील हत्तींपासून ५२२ किलो ८६ ग्रॅम हस्तिदंत गोळा करण्यात आले होते, त्यापैकी एकही हस्तीदंत कायद्यानुसार वन विभागाला देण्यात आले नाही. एप्रिल ते नोव्हेंबर २०१९ या काळात वेगवेगळ्या वजनाचे हस्तिदंत एकतर काढून टाकण्यात आले किंवा कागदपत्रांविना गुरुवायूर देवस्वम्च्या नियंत्रणात राहिले. साहाय्यक वनसंरक्षकांच्या पत्रानुसार, देवस्वम्ला १० दिवसांच्या आत त्यांच्या नियंत्रणातील हस्तिदंतांचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले होते; परंतु मंडळाने कोणतीही माहिती दिली नाही आणि हस्तिदंत किंवा त्याचे तुकडे वन विभागाला दिले नाहीत.

प्रकरण न्यायालयात असून देवस्वम्ने म्हणणे मांडले आहे ! – गुरुवायूर देवस्वम्

गुरुवायूर देवस्वम्चे अध्यक्ष व्ही.के. विजयन् यांनी अहवालात आढळलेल्या अनियमिततेविषयी म्हटले की, हे प्रकरण सध्याच्या मंडळाच्या कार्यकाळाच्या आधीचे आहे. हे आधीच न्यायालयात नेण्यात आले आहे, जिथे देवस्वम्ने म्हणणे मांडलेले आहे.

संपादकीय भूमिका

मंदिर सरकारीकरणाचे आणखी किती दुष्परिणाम उघड झाल्यानंतर ती भक्तांच्या नियंत्रणात दिली जाणार आहेत ? जनताही या विरोधात पेटून का उठत नाही ?