Bangladeshi Cattle Smugglers Killed : त्रिपुरामध्ये ग्रामस्थांवर प्राणघातक आक्रमण करणार्‍या ३ बांगलादेशी गोतस्करांना गावकर्‍यांनी केले ठार !

बांगलादेशाची भारताकडे निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

आगरतळा (त्रिपुरा) – त्रिपुरातील बिद्याबिल गावात १५ ऑक्टोबरला स्थानिक ग्रामस्थांशी झालेल्या संघर्षात ३ बांगलादेशी गोतस्कर ठार झाले. बांगलादेश सरकारने म्हटले आहे, ‘हे मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. भारताने दोषींना शिक्षा करावी. प्रत्येक व्यक्तीचे त्यांचे राष्ट्रीयत्व काहीही असो, त्याचे संरक्षण केले पाहिजे.’ यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, तिघांनी गुरे चोरण्याचा प्रयत्न केला आणि एका चकमकीत ते मारले गेले.’ सीमापार तस्करी रोखण्यासाठी कुंपण उभारण्यासाठी भारताने बांगलादेशाला साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे.

गोतस्करांनी ग्रामस्थांवर शस्त्रांद्वारे आक्रमण केल्याने प्रत्युत्तरात तस्कर ठार

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, ही घटना त्रिपुरातील भारत-बांगलादेश सीमेपासून अनुमाने ३ किलोमीटर परिसराच्या आत घडली. या बांगलादेशी तस्करांनी सीमा ओलांडून बिद्याबिल गावात गुरे चोरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांवर लोखंडी शस्त्रे आणि चाकू यांद्वारे आक्रमण केले. त्यात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला आणि इतर घायाळ झाले. गावकर्‍यांनी प्रत्युत्तर देत तीनही तस्करांना पकडले. या चकमकीत दोघांचा जागीच, तर तिसर्‍याचा रुग्णालयात मृत्यू झाला. तिघांचे मृतदेह बांगलादेशाला परत करण्यात आले आहेत आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

संपादकीय भूमिका

  • सीमेवर प्रतिदिन होत असलेली घुसखोरी रोखली जात नसल्याने ही स्थिती निर्माण झाली. गोतस्कर भारतात घुसतात, गोवंशांची चोरी करतात, भारतियांवर आक्रमण करून परत बांगलादेशात जाण्याचा प्रयत्न करतात, हे लज्जास्पद आहे.
  • भारताकडे निष्पक्ष चौकशीची मागणार्‍या बांगलादेशाला लाज वाटत नाही का ? भारताने गावकर्‍यांवर कोणतीही कारवाई करू नये, असेच जनतेला वाटते !